‘काय बोलावं ? जिवंतपणी उपचार नाही अन् मृत्यूनंतर अवहेलनाच’, रोहित पवारांचा योगी सरकारवर निशाणा
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे या ठिकाणची आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत. गंगा नदीच्या किनारी मोठ्या प्रमाणात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मृतदेह वाळूमध्ये पुरून गंगा नदीच्या किनाऱ्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यामुळे मृतदेहांची विटंबना होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार यांनी ट्विट करुन योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले, कोविडमुळं मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कार करण्याची मार्गदर्शक तत्त्व उत्तर प्रदेशात अक्षरश: गंगेला मिळाल्याचे दिसत आहे. यामुळे आपण कोरोना रोखतोय की पसरवतोय असा प्रश्न पडतो. शिवाय मृतदेहांची होणारी विटंबना वेगळीच ! काय बोलावं ? जिवंतपणी उपचार नाही अन् मृत्यूनंतरही अवहेलनाच ! हे धक्कादायक आहे. रोहित पवार यांनी एक फोटो शेअर केला आहे.
Dead bodies found buried in sand near river Ganga in UP's Unnao
"Our team has found buried bodies in an area far from river. Search being conducted for more bodies in other areas. I've asked team to carry out inquiry. Action will be taken accordingly," said DM (12.05) pic.twitter.com/qFT1tpfsjH
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 13, 2021
दरम्यान, बिहारच्या बक्सरमध्ये चौथा शहरातून वाहणाऱ्या गंगा नदीच्या किनाऱ्यावर सुमारे 100 मृतदेह आढळून आले होते. यानंतर प्रशासनाने हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहून आल्याचे सांगत हात झटकले. या घटनेवरुन बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये संघर्ष पहायला मिळत आहे. याच दरम्यान बिहारच्या बक्सरनंतर उत्तर प्रदेशातील गाझीपुरातील गंगेच्या काठावर मृतदेह आढळून आले. यामुळे एकच खळबळ उडाली होती.