रिक्षाचालकांच्या बँक खात्यात जमा होणार 1500 रुपये, ‘या’ तारखेपासून होणार अंमलबजावणी
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध घटकांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. त्यात कोरोना संकटात राज्यातील रिक्षाचालकांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य देणार असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार आता त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. रिक्षाचालकांना अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया शनिवार (दि. 22) पासून सुरु होणार असल्याची माहिती परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आणि मदत योग्य रिक्षाचालक लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आयसीआयसीआय बँकेतर्फे स्वतंत्र संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीवर परवानाधारक रिक्षाचालकांना 22 मे पासून ऑनलाइन अर्ज करता येईल. यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर न करता संगणक प्रणालीवर वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची माहिती भरल्यानंतर, पडताळणी होऊन रिक्षाचालकांच्या खात्यात तात्काळ दीड हजारांची आर्थिक मदत जमा होणार आहे. रिक्षाचालकांना अर्थसहाय्य देण्यासाठी आवश्यक असलेला निधी शासनाकडून उपलब्ध करण्यात आला असून ज्या रिक्षाचालकांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांच्या संबंधित बँक खात्यात त्यांना एकवेळचे अर्थसहाय्य त्वरित जमा होणार असल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले आहे.