स्वावलंबी भारत पॅकेज म्हणजे ‘क्रूर थट्टा’, सोनिया गांधींची केंद्र सरकारवर टीका

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा बळ देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या स्वावलंबी भारत पॅकेजवर टीका केली आहे. स्वावलंबी भारत पॅकेज ही देशातील नागरिकांची क्रूर थट्टा असल्याचं मत सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं आहे.

लॉकडाऊनमधून बाहेर येण्याची कोणतीही रणनीती मोदी सरकारकडे नाही, असा दावा देखील सोनिया गांधी यांनी केला आहे. प्रमुख विरोधी पक्षाच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये झालेल्या बैठकीत, या सरकारन संघवादाची भावना नष्ट केलीय. या संकटाच्या वेळी सगळ्या शक्ती केवळ पंतप्रधान कार्यालयापर्य़ंत सीमित आहे. विरोधी पक्षांच्या मागण्या कानामागे टाकण्यात आल्या, असं म्हणत सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली.

कोरोना व्हायरसविरुद्धचं युद्ध 21 दिवसांत जिंकण्याची पंतप्रधानांची सुरुवातीची आशा अयोग्य ठरली. औषध तयार होईपर्यंत या व्हायरसचं अस्तित्व नष्ट होणार आहे, असं दिसतंय. माझ्या मते, सरकार लॉकडाऊनच्या मापदंडाविषयी निश्चित नव्हती. त्यांच्याकडे लॉकडाऊनमधून बाहेर येण्यासाठीही कोणतीही रणनीती नाही, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पुढचे पाच दिवस हे पॅकेज विस्तृतपणे मांडलं. पण त्यानंतर मात्र हे आर्थिक पॅकेज क्रूर थट्टा असल्याचं स्पष्ट झालं. गरिबांच्या खात्यात सरकारनं थेट पैसे टाकावेत अशी मागणी आमच्यासहीत अनेक विरोधी पक्षांनी केली. सर्व कुटुंबांना मोफत रेशन दिलं जावं तसंच घरी परतू इच्छिणाऱ्या स्थलांतरीत श्रमिकांना बस आणि रेल्वेच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात तसंच कर्मचाऱ्यांच्या तसच नियोक्त्यांच्या सुरक्षेसाठी वेतन सहाय्यता निधी उभारला जावा, अशीही आम्ही मागणी केली होती. परंतु आमच्या सगळ्या मागण्या न ऐकल्यासारख्या करण्यात आल्याचे सोनिया गांधी यांनी सांगितले.

अनेक तज्ज्ञांनी 2020-21 मध्ये आपल्या देशाचा विकासदर 5 टक्क्यांपर्यंत पोहचेल, अशी शक्यता व्यक्त केलीय. याचे परिणाम भयंकर असतील. सध्या सरकारकडे कोणताही मार्ग नसणं हीच चिंतेची बाब आहे. परंतु, त्यांच्याकडे गरीब वर्गासाठी करुणेचा भावही नसणं ही हृदयविदारक गोष्ट आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.