कोरोना संकटाविषयी RSS प्रमुख मोहन भागवतांनी मांडली भूमिका, म्हणाले – ‘पहिल्या लाटेनंतर आपण गाफील झालो, म्हणून हे संकट उभे राहिले’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  अवघा देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. दिवसागणिक रुग्णसंख्येबरोबरच मृतांचा आकडा देखील वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली असून परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर RSS चे प्रमुख मोहन भागवत यांनी कोरोना संकटाविषयी स्पष्ट भूमिका मांडली आहे. कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर आपण सगळे काहीसे गाफील झालो. म्हणून दुस-या लाटेचे संकट उभे राहिले आहे. आता तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. पण या लाटेला न घाबरता तिला परत फिरावे लागेल, अशी तयारी आपल्याला करावी लागणार असल्याचे भागवत यांनी म्हटले आहे.

ऑनलाईन व्याख्यान श्रंखलेमध्ये भागवत बोलत होते. आपल्यातील अंतर्गत भेदभाव विसरून एकत्र येऊन या संकटाशी लढा द्यावा लागणार असल्याचे ते म्हणाले. जे धैर्यवान लोक असतात, ते कायम प्रयत्न सुरूच ठेवतात. आपल्यालाही तसेच करायचे आहे. संपूर्ण भारताला एक समाज म्हणून सर्व भेदभाव विसरून, गुणदोषांच्या चर्चांमध्ये न अडकता एकसंघ बनून काम करावे लागणार आहे .एकमेकांच्या गुणदोषांची चर्चा करण्यासाठी नंतर वेळ मिळणारच आहे. पुण्यातील उद्योजक, प्रशासक, रुग्णालय, जनतेचे प्रतिनिधी आदीनी एक टीम म्हणून प्रयत्न केला. सामुहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे भागवत म्हणाले. वैज्ञानिकतेचा आधार घेणे आवश्यक आहे. कुणी सांगतं म्हणून ते योग्य आहे किंवा एखादी गोष्ट नवीन आहे म्हणून ती योग्य आहे किंवा जुनी आहे म्हणून योग्य आहे, असे माहितीच्या बाबत करू नका. जे काही तुमच्यापर्यंत येत आहे, त्याचे वैज्ञानिकतेच्या आधारावर परीक्षण करूनच त्याचा स्वीकार करा. आपल्याकडून कोणतीही निराधार बाब समाजात जाऊ नये याची काळजी घ्यावी, असे ते म्हणाले. आयुर्वेदाच्या नावावर अनेक चर्चा अशा सुरू असतात. पण वैज्ञानिकतेच्या तर्कावर जोपर्यंत त्या गोष्टी सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत अशा गोष्टींबाबत सावध राहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.