RSS भारतातील दहशतवादी संघटना : राजरत्न आंबेडकर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी संघावर तीव्र शब्दात निशाणा साधला. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS )ही भारतातील दहशतवादी संघटना असून यासंबंधित पुरावेही आपल्याकडे आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. काल प्रजासत्ताक दिनी कर्नाटकात आयोजित एका सभेमध्ये बोलत होते.

यावेळी राजरत्न यांनी पाकिस्तानमध्ये केलेल्या भाषणाचा हवाला देत म्हटले की, आरएसएस भारतातील दहशतवादी संघटना आहे. या संघटनेवर बंदी आणली पाहिजे. माझ्याकडे यासंबंधीत सर्व पुरावे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजुला साध्वी बसलेली आहे. ती मुलाखतीत सांगते की, जेव्हा भारतीय सैन्याकडील दारुगोळा, बंदुका संपल्या, तेव्हा आरएसएसने त्यांना ती पुरविली. मग आरएसएसकडे एवढे बॉम्ब कसे आणि कुठून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंदुका कुठून आल्या,असा सवाल त्यांनी विचारला.

ते पुढे म्हणाले कि, पंतप्रधानांच्या बाजुला बसलेली साध्वी अशा प्रकारचे विधान करते. ज्या घरात बॉम्ब सापडतो ते घर आणि त्या घरातील मुलगा दहशतवादी ठरत नाही का. मग जर या संघटनेकडे जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर दारुगोळा किंवा शस्त्रसाठा असेल तर ही संघटना दहशतवादी होत नाही का ? असा आरोप राजरत्न यांनी केला. तसेच या संघटनेचे लोक आज अनेक दहशतवादी कृत्यामध्ये पकडले जात आहेत. त्यामुळे या संघटनेवर जागतिक बंदी आणण्याची गरज आहे. ते काम आम्ही करत आहोत, असेही राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.