भाडे नाकारणाऱ्या 918 रिक्षा चालकांचे ‘मीटर डाऊन’, RTO कडून ‘परवाने’ रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रवाशी भाडे नाकारणाऱ्या शहरातील रिक्षा चालकां विरोधात प्रादेशिक परिवहन कार्य़ालयाने (RTO) करावाई करण्यास सुरुवात केली आहे. मागील सहा महिन्यामध्ये आरटीओने प्रवाशांना नकार घंटा लावणाऱ्या आणि प्रवाशी भाडे नाकारणाऱ्या ९१८ रिक्षा चालकांचे परवाने कायमचे रद्द केले आहेत. मुंबई आणि ठाण्यामध्ये वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे प्रवाशांकडून कौतुक होत आहे. दरम्यान, परवाने रद्द करण्याची रिक्षा चालकांची याचिका फेटाळून लावण्यात आली असून त्याना कुठेच प्रवासी वाहतूक करता येणार नाही.

राज्य परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी फेब्रुवारी महिन्यापासून प्रवाशांना नकार देणाऱ्या  रिक्षाचालकांविरुद्ध विशेष मोहिम राबवली होती. यामध्ये मागील सहा महिन्यात १२ हजार ३४२ रिक्षा चालक दोषी आढळले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर यापैकी ९१८ रिक्षाचालकांचा रिक्षा चालवण्याचा परवाना आरटीओने रद्द केला आहे. कारवाई केलेल्यांपैकी ५ हजार ५०० चालकांना तीन पेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे, ६ हजार २५७ जणांवर बिल्ला नसणे किंवा परवाना नसल्याबद्दल तर ४२ जणांना अतिरिक्त भाडे आकारल्याप्रकरणी दोषी ठरवत दंड ठोठावण्यात आला आहे.

कारवाई करण्यात आलेल्या रिक्षाचालकांपैकी ६० टक्के रिक्षा चालक हे बिकेसी, वांद्रे टर्मिनस, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस भागातील असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रवाशांनी केलेल्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी ‘स्पेशल १४’ टीमची स्थापना करण्यात आली आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी तानाजी चव्हाण यांनी सांगितले की, आम्ही रिक्षाचालकांची चौकशी करणे. तसेच प्रवासी बनून त्यांनी भाडं नाकारल्यावर त्यांच्यावर कारवाई करणे या माध्यमातून कारवाई करतो.

आरोग्यविषयक वृत्त –