15 August : सरकारची नियमावली ! ‘आत्मनिर्भर भारत’ घोषणेचा प्रसार करा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या दरम्यान 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा स्वातंत्र्य दिन कार्यक्रमालाही लॉकडाऊन नियमावली बंधनकारक असणार आहे. शाळा, महाविद्यालये बंद असल्याने केवळ संबंधित संस्था वा व्यक्तीच्या पुढाकाराने कमी माणसांमध्ये ध्वाजारोहणाचा कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. यंदा भारत 73 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असून दरवर्षी प्रमाणे हा कार्यक्रम साजरा करण्यावर यंदा मर्यादा आहेत. वस्तुस्थिती व सावधगिरीचा उपाय म्हणून हे निर्देश देण्यात आल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने यंदाच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमासाठी परिपत्रक काढले असून काही सूचना केल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईतील मंत्रालयात सकाळी 9.05 वाजता ध्वाजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. तर राज्यपाल यांच्या हस्ते पुण्यात ध्वाजारोहण होणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यात व विभागीय क्षेत्रात पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वाजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. राज्यभरात एकाचवेळी म्हणजे सकाळी 9.05 वाजता ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात यावा असे सांगण्यात आले आहे.

यंदाच्या ध्वाजारोहण सोहळ्याला शहीद जवानांच्या पत्नी, आई-वडील, कोरोना योद्धा आणि कोरोनावर मात केलेल्या नागरिकांना आमंत्रित करावे, असेही सूचवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेऊन, लॉकडाऊनची नियमावली पाळून ध्वाजारोहणाचा कार्यक्रम करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या कार्यक्रमातून सोशल मीडियाद्वारे आत्मनिर्भर भारत या घोषणेचा प्रसार करण्यात यावा, असेही सांगण्यात आले आहे.

नागरिकांनी सोशल मीडिया व डिजीटल मीडियातून ध्वाजारोहण सोहळा साजरा करताना देशभक्तीपर गीते, वेबिनार यांचे आयोजन करावे. तसेच घरातील बाल्कनीत आणि गच्चीवर जाऊन हाती तिरंगा फडकवावा, असेही आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. तसेच हा कार्यक्रम साजरा करताना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या गृह मंत्रालय व आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे.