लग्नात मास्क घातला नाही म्हणून नवरदेव नवरीला झाला 10 हजारांचा दंड

पोलिसनामा ऑनलाईन – लग्नात मास्क न घातल्याने पंजाबमधल्या जोडप्याला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. विशेष म्हणजे पळून लग्न केलेल्या या जोडप्याने संरक्षणासाठी कोर्टात धाव घेतली होती. कुटुंबीय या लग्नाविरोधात होते म्हणून त्यांनी लग्नानंतर संरक्षणासाठी कोर्टात धाव घेतली असता मास्क न घातल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पंजाब व हरियाणा हायकोर्टाने त्यांना 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

लग्नाच्या फोटोंमधून जोडप्याने मास्क न घातल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयातील न्यायमुर्ती हरी पाल वर्मा यांच्या खंडपीठाने हा दंड ठोठावला. लग्नाच्या फोटोंमध्ये वर-वधू आणि इतर उपस्थित लोकांनी मास्क घातला नाही. कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे मास्क घालणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित जोडप्याने 15 दिवसांच्या आत 10 हजार रुपयांचा दंड भरावा. ही रक्कम होशियारपूरमधल्या लोकांना मास्क पुरवण्यासाठी वापरण्यात येईल, असे आदेश खंडपीठाने दिले. याचसोबत या नवविवाहित दाम्पत्याला कुटुंबीयांकडून कोणताही त्रास होऊ नये यासाठी योग्य ती पाऊले उचलण्याचे आदेश गुरदासपूरच्या वरिष्ठ पोलीस अधिक्षकांना देण्यात आले आहेत. कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे संपूर्ण देशात मास्क वापरणे बंधनकारक आहे. स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षेसाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे हे नियम न पाळणार्‍यांवर योग्य ती कारवाई केली जात आहे.