फडणवीसांनी सरकारला फटकारले; म्हणाले – ‘हे तर चर्चेपासून पळ काढणारे पळपुटे सरकार’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अवघे काही तास शिल्लक असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर विशेषतः शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. या सरकारचे एकमेव काम बदल्या असून आयएएस आणि आयपीएस बदल्यांमध्येसुद्धा भ्रष्टाचार सुरू आहे. यापूर्वी कधीही राज्यात असा दुर्दैवी प्रकार नव्हता, अशी टीका करत फडणवीस म्हणाले, तीन पायाच्या सरकारला कोणतीच चर्चा नको आहे, चर्चेपासून पळ काढणारे हे इतिहासातील सर्वात छोटे अधिवेशन असल्याचा आरोपहि त्यांनी यावेळी केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे. ना कर्जमाफी मिळाली ना प्रोत्साहन रक्क्म केवळ हे सरकार आश्वासनापलीकडे काहीच करत नाही. ९० टक्के सॊयबीन गेले, बोंडअळीमुळे कापूस गेला पण शेतकऱ्यांना मदत काही मिळाली नाही.

कोरोना काळात वीज न वापरताही महावितरणकडून अव्वाच्या सव्वा बिले आली. या सरकारने दोन वेळा वीज दरवाढ केली. आतापर्यंत ७५ लाख लोकांना नोटिसा पाठवत साडेतीन लाख वीज कनेक्शन कापली. महावितरणकडून वीजबिलांच्या वसुलीचा जो काही प्रकार सुरु आहे तो म्हणजे मोगलाई आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी राज्य सरकारला फटकारले.

महिला अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या अत्याचारात सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्रीच आघाडीवर आहेत. सामान्यांसाठी आणि सत्तापक्षासाठी वेगवेगळे न्याय आहेत. लैंगिक स्वैराचाराची स्वतःच्या नेत्यांना मुभाच दिली गेली आहे. त्यामुळे शक्ती कायदा एक फार्स असून या कायद्यासाठीच्या संयुक्त समितीतून भाजप आमदार बाहेर पडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

सत्तेसाठी इतकी लाचारी नको
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काँग्रेसने कायमच अपमान केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या नादी लागून सावरकरांचा अपमान करत आहेत. त्यांच्या पुण्यतिथीला ना अभिवादन केले, ना एक ट्विट. सत्ता येते, जाते. पण सत्तेसाठी किती लाचारी स्वीकारतो त्याची इतिहास नोंद करतो. सत्तेसाठी शिवसेनेने इतकी लाचारी पत्करू नये, असा सल्लाही फडणवीस यांनी यावेळी दिला.