साहित्य संमेलन म्हणजे लाखो लोकांचा गोंधळ- सचिन कुंडलकर 

पुणे : वृत्तसंस्था – आगामी मराठी साहित्य संमेलन यवतमाळ येथे पार पडणार आहे. त्यावर दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बोट ठेवलं आहे. त्यांनी आपल्या फेसबुकवरून साहित्य संमेलनाबद्दल पोस्ट लिहीली आहे. लाखो लोकांनी कुठेतरी जाऊन गोंधळ घालायच्या या कार्यक्रमांचा पुनर्विचार करता येईल का, असा सवाल त्यांनी या पोस्टमध्ये केला आहे.
साहित्य संमेलनाच्या नियोजनात उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमिवर कुंडलकरांनी फेसबुकवर तशी पोस्ट लिहीली आहे.

कुठल्या तरी अनोळखी जागी जाऊन भयंकर गर्दी करून भाषणे ऐकण्यापेक्षा ज्यांना भेटायचे आहे त्या लेखकांनी आणि कवींनी आपसांत फोन करून पुण्यामुंबईत किंवा चांगल्या निसर्गरम्य जागी जमावे. तिथं छोटी अनौपचारिक गेट-टुगेदर्स केली तर जास्त चांगले होणार नाही का, असा टोला कुंडलकरांनी लावाला आहे.

दरम्यान, मला तर यवतमाळ कुठे आहे हेच माहित नव्हते. ते आमच्या प्रणव सुखदेवने समजावले. भरपूर मोकळेपणाने लिहायला आणि मनसोक्त वाचायला लाखो माणसांनी येऊन गर्दी करायची काय गरज आहे? आपल्या पूर्वजांकडे संपर्काची साधने नव्हती. त्यामुळे ती माणसे सारखी सणवार, उत्सव भरवून गर्दी करत. आजच्या काळात तसे करायची गरज उरली आहे का?,’ असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.