Sachin Sawant : ‘देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी ‘ते’ व्हेंटिलेटर सुरू करून दाखवावेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पंतप्रधान केअरमधून महाराष्ट्रात पाठवण्यात आलेले व्हेटिंलेटर्स तकलादूच असून जनतेच्या जीवापेक्षा मोदींची प्रतिमा महत्वाची वाटणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे व्हेंटिलेटर सुरू करुन दाखवावे, असे आव्हान काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिले आहे.

सचिन सावंत म्हणाले, केंद्राने दिलेले व्हेटिंलेटर्स तकलादूच असून त्याबाबत सुरु असलेली सारवासारवही उघड झालीय. भाजपा नेत्यांचं खोटं उघड पाडणाऱ्या औरंगाबाद शासकीय वैद्यकीय कॉलेजच्या १७ मे च्या वस्तूस्थितीदर्शक अहवालाने केंद्र सरकार आणि गुजरात भाजपा नेत्यांच्या जवळच्या ज्योती CNC कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न उघडा पडला. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या उत्तराने केंद्र सरकारच्या कांगाव्याची पोलखोल झाली आहे. असे सावंत यांनी म्हटले आहे.

पुढे सावंत म्हणाले, खाजगी रुग्णालयांना उसनवारीने व्हेंटिलेटर दिले व व्हेंटिलेटरसाठी रुग्णांकडून शुल्क घेऊ नये ही अट टाकली त्यात चूक काय? खाजगी रुग्णालये देखील ती वापरत नाहीत. भाजपाकडून मात्र अनावश्यक बदनामी केली जातेय. तकलादू व्हेंटिलेटर देऊन मोदी सरकारने जनतेच्या पैशाचा अपव्यय व जनतेच्या जीवाशी खेळ केला आहे. म्हणून केंद्र सरकारच्या १४ मे रोजी केलेल्या कांगाव्याला उत्तर देणाऱ्या या अहवालाने हे प्रकरण दाबण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. हे आता स्पष्ट झालय. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित याचे लेखापरीक्षण करावे ही व राज्य सरकारकडे केलेली चौकशीची आमची मागणी पूर्णपणे योग्य आहे हेच यामधून सिद्ध झाले आहे असे देखील सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?
औरंगाबाद मेडिकल कॉलेज ने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात ज्योती CNC कंपनीचे व्हेंटिलेटर पूर्णतः तकलादू आहे. ५८ व्हेंटिलेटर तकलादू निघाल्याने इतर ३७ व्हेंटिलेटर उघडून पाहण्याचे या कंपनीचे धाडस झाले नाही. १४ मे रोजी केंद्राने केलेली सारवासारव खोटी होती. ज्योती CNC चे व्हेंटिलेटर १२ एप्रिलला आले. केंद्र सरकारने १९ एप्रिलला सांगितले हे खोटं आहे.

त्या अहवालाच्या अनुषंगाने महाराष्ट्र काँग्रेस ने केंद्राने PM केअर्स फंडातून महाराष्ट्राला दिलेल्या सर्व व्हेंटिलेटरची चौकशी करून कारवाई करावी अशी राज्य सरकारला मागणी केली होती. यावर राष्ट्रीय स्तरावर वादळ उठल्यानंतर १४ मेला केंद्राने त्यावर उत्तर देऊन ज्योती CNC कंपनीला वाचवण्याचा आणि सर्व दोष औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रूग्णालयावर टाकण्याचा प्रयत्न केला. आता केंद्राच्या कांगाव्याची पोलखोल औरंगाबाद मेडिकल कॉलेजने केंद्र सरकारला प्रत्युत्तर देऊन केली आहे. तसेच, जनतेच्या पैशाचा भयानक अपव्यय झाल्याचे उघड केले आहे, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.