Sachin Vaze : अनिल देशमुखांनी 2 तर अनिल परब यांनी 50 कोटींची मागणी केली होती, सचिन वाझेंकडून सनसनाटी आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप अनिल देशमुख यांच्यावर केले होते. यावरून त्यांच्या चौकशीचे आदेश हाय कोर्टाने दिले असता तेव्हा देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. तर यानंतर आता निलंबित पोलीस अधिकारी यांनी अनिल देशमुख आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख यांनी २ कोटी, अनिल परब यांनी एका कंपनीकडून तब्बल ५० कोटी, आणि मुंबईतील ५० ठेकेदारांकडून २ कोटी वसूल करण्यास सांगितले होते, असे वाझे यांनी पत्रातून म्हटले असल्याचे समोर आले आहे. परंतु, न्यायालयात हे पत्र सादर केले नाही.

सचिन वाझेंनी ३ एप्रिल रोजी इंग्लिशमधून हे पत्र लिहले असल्याचे समजते. तर त्या पत्रातून सचिन वाझे म्हणतात की, पुन्हा सेवेत रुजू झाल्यावर अनिल देशमुख यांनी मला फोन करून शरद पवार यांनी तुम्हाला निलंबित करण्यास सांगितले आहे, त्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी २ कोटींची मागणी केली. त्यावर वाझे आपल्याला शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर पैसे नंतर देण्यास सांगितले. पुन्हा जानेवारी महिन्यात भेटलो तेव्हा, त्यांचा पीए कुंदन याने १,६५० बारमधून प्रत्येकी ३ ते ३.५० लाख दर महिन्याला आणण्यास सांगितले. पण त्यावरही आपण नकार दिला.

मंत्री अनिल परब यांनी जुलै/ऑगस्ट महिन्यात आपल्याला बोलावून ‘SBUT’ ची चौकशी सुरू करून पन्नास कोटींची मागणी करण्यास सांगितले. ते शक्य नाही असे म्हटल्यावर पुन्हा या वर्षी जानेवारी महिन्यात बोलावून घेऊन मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आलेल्या ५० ठेकेदारांची चौकशी आणखी सुरू करण्यास सांगून त्यांच्याकडून २ कोटी रुपये वसूल करण्याची सूचना केली होती, परंतु त्यावरही आपण नाही म्हटले. ही सर्व गोष्ट परमबीर सिंग यांना भेटून सांगितली होती. आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती त्यांना सांगितल्यावर परमबीर सिंग यांनी आपल्याला काम करत राहण्याची सूचना केली होती.

या दरम्यान सचिन वाझेचे हे पत्र न्यायालयाने स्वीकारले नाही. हा देत असलेला जबाब लेखी स्वरूपात, लिहून द्यावा किंवा तयार करून देण्यास सांगितले. मात्र सचिन वाझेनी तशा पद्धतीने देण्यास नकार दिला आहे. तर सचिन वाझेच्या या ३ पानी पत्रामधील आरोप मंत्री परब व देशमुख यांनी फेटाळून लावले आहेत. जाणिवपूर्वक बदनामीसाठी असले आरोप केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, वाझेंचे पत्र न्यायालयात सादर केले नसल्याचे समजते.