वाझे प्रकरणावरून शिवसेनेचे भाजपवर टीकेचे ‘बाण’

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन – कोणत्या ना कोणत्या प्रश्नावरून शिवसेना आणि भाजप यांच्या कलगीतुरा रंगल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नुकतेच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण शांत होते न होते तो प्रयत्न अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात जुंपल्याचे दिसत आहे. अगदी विधानसभा अधिवेशनातही या प्रकरणावरून घमासान चर्चा करत भाजपने सरकारला कोंडीत पकडले होते. दरम्यान, ‘एनआयए’ने सचिन वाझे यांना अटक केली. वाझे यांना सध्या एनआयए कोठडी सुनावण्यात आली असली, वाझे यांना अटक झाल्यानंतर भाजपाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली. भाजपकडून होत असलेल्या टीकेला शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून चोख उत्तर दिले आहे. मुंबई पोलिसांनी सुशांत राजपूत प्रकरणाचा उत्तम तपास केला असतानाही तरीही केंद्राने सीबीआयला घुसवले. त्या सीबीआयने तरी काय दिवे लावले? हात चोळत बसले, असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर टीकेची बाण सोडले.

मुंबई पोलीस दलातील एक तपास अधिकारी सचिन वाझे यांना एनआयए म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेने अटक केली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराच्या परिसरात जिलेटिनच्या वीस कांड्या असणारी एक संशयास्पद स्कॉर्पिओ गाडी आढळली. त्यामुळे खळबळ माजली. अंबानींचे नाव आल्यामुळे हे सर्व प्रकरण पोलिसांनी फारच मनावर घेतले. हे सर्व का झाले, कसे झाले यावर चर्चा सुरू झाल्या, पण काही दिवसांतच मुंब्य्राच्या खाडीत या गाडीचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह सापडल्याने अंबानी यांच्या घरासमोर न फुटलेल्या जिलेटिन कांड्यांचा ‘स्फोट’ झाला आहे. विधानसभेत हे प्रकरण विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी लावून धरले. सरकारने वाझे यांची बदली करून संपूर्ण प्रकरणाचा तपास राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडे दिला. तपास सुरू असतानाच केंद्र सरकारने ‘एनआयए’ला तपासाला पाठवले. त्याची इतक्या तातडीने गरज नव्हती, पण महाराष्ट्रातील एखाद्या प्रकरणात नाक खुपसायला मिळते म्हटल्यावर केंद्रीय तपास यंत्रणा मागे कशा राहतील? वीस जिलेटिन कांड्यांचा व गाडी मालकाच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एनआयएने हाती घेतला. एक दोन दिवस चौकशी केली आणि लगेचच तपास अधिकारी असणारे वाझे यांना अटक करण्याची कर्तबगारी दाखवली. वाझेंच्या अटकेने भारतीय जनता पक्षात जे आनंदाचे भरते आले आहे वाझे यांना अटक झाली हो असे गर्जत हे लोक रस्त्यावर यायचेच काय ते बाकी आहेत.

या आनंदामागीलही कारण तसेच आहे, काही महिन्यांपूर्वी अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रायगड पोलिसांच्या मदतीने वाझे यांनी भाजपावाल्यांचा महंत अर्णब गोस्वामी यास बेड्या ठोकल्या होत्या. त्या वेळी गोस्वामी याच्या नावाने हे सर्व लोक रडत होते व वाझे यांना शाप देत होते. केंद्रात आमचीच सत्ता आहे, थांबा, बघून घेऊ, असे सांगत होते. तो मोका आता साधला असून २० जिलेटिन कांड्यांच्या प्रकरणात वाझे यांना केंद्रीय पथकाने अटक केली आहे. वाझे यांची अटक कायदेशीर की बेकायदेशीर, या चर्चेला आता अर्थ नाही,” अशी टीकाही शिवसेनेनं केली आहे.

काय म्हंटल आहे सामनाच्या आजच्या अग्रलेखात
सध्या विरोधकांची सरकारे अस्थिर किंवा बदनाम करण्यासाठी कोणत्याही थराला जायचे, बनावट प्रकरणे निर्माण करायची, राज्य सरकारच्या अधिकारांवर अतिक्रमण करायचे हे प्रकार सर्रास चालले आहेत. मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणात उत्तम तपास केला, तरीही केंद्राने सीबीआयला घुसवले. त्या सीबीआयने तरी काय दिवे लावले? हात चोळत बसले. कंगना राणावत या बेताल नटीने बेकायदेशीर कृत्ये केली असतानाही केंद्र सरकार व भाजपावाले तिच्या समर्थनासाठी उभे राहिले. आता २० जिलेटिन कांड्यांचे प्रकरण राज्याचे दहशतवादविरोधी पथक तपासत असतानाच ‘एनआयए’ने त्यात उडी मारली. अर्णब गोस्वामीस अटक करून त्यास तुरुंगात टाकल्यापासून वाझे हे भाजप आणि केंद्राच्या हिटलिस्टवर होतेच. मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंतही केंद्रीय पथकाची थांबायची तयारी नव्हती. देशभरात रोजच २० जिलेटिनच्या कांड्या सापडण्यासारखे प्रकार घडत आहेत. आजही कश्मीर खोऱ्यांत स्फोटकांचे साठे सापडत आहेत, पण तिकडे हे एनआयएचे पथक गेले काय? पुलवामात स्फोटकांचा साठा नक्की कोणत्या फटीतून आत घुसवला व त्या स्फोटांत आपल्या चाळीस जवानांचे कसे बळी गेले, हे आजही गौडबंगालच आहे! बिहार-नेपाळ सीमेवर हत्यारांची, स्फोटकांची आवक-जावक सुरूच असते. मणिपूर-म्यानमार सीमेवरील स्थिती अशा बाबतीत गंभीरच असते. नक्षलग्रस्त भागात तर बंदुका, स्फोटकांचे कारखानेच निर्माण झाले असून तेथे देशविरोधी कट-कारस्थाने सुरू आहेत, पण तुमचे जे जिलेटिन छाप एनआयए की काय आहे, ते त्या स्फोटकांचा वास घ्यायला गेले नाही. केंद्राला तशी गरजच वाटत नसावी,” असा निशाणा शिवसेनेनं केंद्र सरकारवर साधला आहे.

एनआयए’चे असे येणे हे मागचा हिशेब चुकता करण्यासाठीच…
अलीकडे केंद्र सरकारचे धोरणच झालेले दिसते की, महाराष्ट्रात काही खुट्ट झाले की, या केंद्रीय यंत्रणा लगेच महाराष्ट्रात धाव घेतात. आपल्या देशातील अंबानी हे बडे प्रस्थ आहेत. त्यांच्या सुरक्षेत कोणतीही खोट असता कामाच नये. म्हणूनच त्यांच्या घराच्या परिसरात सापडलेल्या २० जिलेटिनच्या कांड्या व त्यानंतर झालेला मनसुख हिरेनचा मृत्यू हे दोन्ही प्रकार गंभीरच आहेत, पण केंद्र सरकार या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांना जमणार नाही हे परस्पर कसे काय ठरवू शकते? मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपींना फासावर लटकविणारे जसे मुंबईचे पोलीस आहेत तसे ‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यातील कसाबसारख्यांना प्राणाची बाजी लावून पकडणारे व फासावर लटकवणारेही मुंबई-महाराष्ट्राचेच पोलीस दल आहे. अर्थात, आता यानिमित्ताने एक स्पष्ट झाले, ‘एनआयए’चे असे येणे हे मागचा हिशेब चुकता करण्यासाठीच होते. भंपक गोस्वामीला वाझे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडले, त्याचा टीआरपी घोटाळा उघड केला. त्या बदल्यात केंद्राने वाझे यांना पकडून दाखवले. इथेच ही केस फाईल बंद होते. वाझे यांचे काही चुकलेच असेल व २० जिलेटिन कांड्यांत ते गुन्हेगार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यास मुंबई पोलीस, दहशतवादविरोधी पथक सक्षम होतेच, पण केंद्रीय तपास पथकाला ते होऊ द्यायचे नव्हते. त्यांनी वाझे यांना अटक करून महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला आहे. हे सर्व ठरवून घडवले जात आहे. वाझे यांना अटक करून दाखवली, याचा आनंद जे व्यक्त करीत आहेत ते राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घालीत आहेत. सत्य लवकरच बाहेर येईल, ही अपेक्षा, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.