प्रभू रामचंद्रांसाठी साबरमती एक्स्प्रेसमधून बचावलेल्या कार सेवकांची अनोखी गोष्ट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राम मंदिर निर्माणासाठी आतापर्यंत केलेली आंदोलने, संघर्षाचा अनेकांकडून आढावा घेतला जात आहे. गुजरातच्या गोध्रा रेल्वे स्थानकात 2002 साली साबरतमी एक्स्प्रेसला लावण्यात आलेली आग आणि त्यानंतर संपूर्ण गुजरामध्ये उसळलेल्या दंगलीच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या आहेत.

गुजरातच्या आनंद जिल्ह्यातील सोजित्रा तालुक्यातील रुन गावातील एकूण 24 जण कारसेवक अयोध्येमध्ये गेले होते. या 24 जणांमध्ये 18 महिला होत्या. 27 फेब्रुवारीला गोध्रा रेल्वे स्थानकातील साबरमती एक्स्प्रेसच्या ड-6 डब्ब्याला लावण्यात आलेल्या आगीमध्ये 18 पैकी सहा महिलांचा होरपळून मृत्यू झाला. गोध्रा रेल्वे स्थानकात ट्रेनला आग लावण्याच्या या घटनेमध्ये 59 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींमध्ये 1200 नागरिकांचा मृत्यू झाला. यात बहुतांश मुस्लिम होते.

यासंदर्भात आज कोणाच्याही मनात द्वेषाची भावना नाहीय. आम्ही ते प्रभू रामचंद्रांसाठी बलिदान मानतो. राम मंदिराच्या निर्माणाने मला खूप आनंद झाला आहे. कोरोना नसता तर अधिक जास्त आनंद झाला असता असे कारसेवक म्हणून अयोध्येत गेलेल्या जयंतीभाई यांच्या काकी म्हणाल्या. ड-6 डब्ब्याला आग लावली, त्यावेळी जयंतीभाई यांच्या काकी साबरमती एक्स्प्रेसमध्ये होत्या. भूमिपूजनाचा दिवस खास असल्याने त्या आज दिप प्रज्वलित करणार आहेत. जयंतीभाई यांची आई सुद्धा कारसेवक म्हणून अयोध्येत गेली होती.