थकीत ऊस देयकाच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी मंत्री दिसतील तिथे त्यांना अडवण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने त्यांना लक्ष्य केले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा अन्यथा अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा सुरळीत होऊ देणार नाही, असा इशारा शेट्टींनी दिला होता.
साखर कारखानदारांच्या दारात जाऊन आंदोलन करण्याची हिंमत राजू शेट्टी यांच्यात राहिली नाही. दगड मारुन ब्रेकिंग न्यूज करण्यापलिकडे शेट्टींच्या संघटनेत हिंमत नाही, अशी टीका सदाभाऊंनी केली आहे. अमित शाह आणि मंत्र्यांना अडवायला मोगलाई नाही. वेळ पडल्यास ‘इट का जवाब पथ्थर से’ देऊ’ असा प्रतिइशारा खोत यांनी दिला. त्यासोबतच लोकसभा निवडणूक लढवली तर हातकणंगले मतदार संघातूनच लढवणार, असं खोत यांनी म्हटलं आहे.
त्यानंतर मात्र स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यात असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना त्यांनी लक्ष्य केले. तेथील जयसिंगपूर शहरातील जवाहर , दत्त आणि गुरुदत्त साखर सहकारी कारखान्याचे विभागीय कार्यालय फोडले आहे.
दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे कोल्हापुरात येणार आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर ऊस दराचा वाद पुन्हा हिंसक घटनांकडे वळू लागला आहे. त्यामुळे या ऊस दराच्या आंदोलनावर राजू शेट्टी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.