‘गायीच्या चेहऱ्यावर हात फिरवल्यावर BP येतो नियंत्रणात’ ; साध्वी प्रज्ञासिंह यांचा नवा दावा

भोपाळ : वृत्तसंस्था – साध्वी प्रज्ञासिंह यांना भोपाळ मतदार संघातून भाजपाची उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी काल दिनांक २२ रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शहीद हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे साध्वी प्रज्ञासिंह चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांच्याबाबत जोरदार चर्चा केली जात आहे. असे असताना ते वादळ शांत होते न होते तोपर्यंत आता प्रज्ञासिंह यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केले आहे.

हाय बीपी म्हणजेच उच्च रक्तदाब या रोगावरील इलाज साध्वी प्रज्ञासिंह यांनी सांगितला. एवढेच नव्हे तर गोमूत्र प्राशन केल्यामुळे हे आजार बरे होतात असे वक्तव्य त्यांनी केले आहे. आता त्यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गायीच्या पाठीवरून हात फिरवला की रक्तदाबाचा आजार बरा होतो.तसेच गायीच्या चेहऱ्यावरून हात फिरवला तरी रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते. असे वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. साध्वी प्रज्ञासिंह एवढ्यावरच थांबल्या नाहीत तर त्या पुढे म्हणाल्या, त्यांनाही कॅन्सर झाला होता आणि आपल्या कॅन्सरवरही आपणच इलाज केला, असंही सांगायला साध्वी विसरल्या नाहीत.

शहीद करकरे यांच्याबद्दल नक्की काय म्हणाल्या प्रज्ञासिंह

मालेगाव बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचे गंभीर आरोप असताना त्यांना उमेदवारी देण्यावरून सध्या विरोध होत आहे. त्याचदरम्यान त्यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल संतापजनक वक्तव्ये केली आहेत.

“मी त्याला सांगितलं होतं तुझा सर्वनाश होईल. ठीक सव्वा महिन्यात सुतक लागतं. ज्या दिवशी मी गेले होते. त्याचं सुतक लागलं होतं. आणि ठिक सव्वा महिन्याने ज्या दिवशी दहशतवाद्यांनी त्याला गोळी मारली त्या दिवशी त्याचा अंत झाला”. असे प्रज्ञा सिंह म्हणाल्या.