दुर्देवी ! साहित्य अकादमी विजेता नवनाथ गोरे यांच्यावर आली ‘ही’ वेळ

पोलिसनामा ऑनलाईन टीम – साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेल्या जत तालुक्यातील उमदीजवळच्या निगडी खुर्दमधील युवक नवनाथ गोरे यांच्यावर रोजंदारीने काम करण्याची वेळ आली आहे. संघर्षमय जीवन जगतानाच त्याने लिहिलेल्या ‘फेसाटी’ कादंबरीमुळे तो प्रसिद्धीस आला होता. या पुरस्कारानंतर त्याचे जागोजागी सत्कार, कौतुक सोहळे झाले. सत्काराचे दिवस सरले तशी ही आश्वासनेही हवेत विरल्यामुळे नवनाथचे जीवन पुन्हा पहिल्यासारखे सुरू झाले.

घरची हलाखीची स्थिती, फिरस्ते जीवन या सार्‍यावर मात करत त्याने पदव्युत्तर शिक्षण घेतले, शिक्षणशास्त्रातील पदवीही घेतली, लेखनाची आवड म्हणून कथा-कादंबरी आकारास येऊ लागल्या, यातीलच एक साहित्यकृती ‘फेसाटी’ला साहित्य अकादमी पुरस्कारही प्राप्त झाला. पण या सार्‍या यशोगाथेनंतरही तो आज दुसर्‍याच्या शेतात रोजंदारीवर काम करत कुटुंबाचे पोट भरत आहे. एकामाजी मंत्र्यांनी त्यांच्या संस्थेत हंगामी शिक्षकाची नोकरी दिली.

अवघ्या 10 हजार रुपये पगारावर नवनाथ इथे रुजूही झाला. पण कोरोनामुळे त्याच्या आयुष्याची दिशा पुन्हा बदलली आहे. करोना संसर्गामुळे शाळाच बंद झाल्यामुळे हंगामी शिक्षकांच्या नोकर्‍याच धोक्यात आल्या. गावी आलेल्या नवनाथने पुन्हा रुजू होण्यासाठी संबंधित संस्थेकडे चौकशी केल्यावर आता नोकरी हवी असेल तर केवळ तीन हजार रुपये मानधनावर काम करावे लागेल असे कळवले आहे. 10 हजारातच जगणे अवघड असताना हा नवा प्रस्ताव स्वीकारणे तर खूपच अवघड होते. शेवटी नवनाथने गावी राहतच शेतात मोलमजुरी करण्यास सुरुवात केली आहे.