लोकसभेत ३५० जागा मिळवून देणाऱ्या रामाला आता तरी हक्काचे छप्पर द्या : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘जो रामाचा नाही तो कामाचा नाही’ असा निर्णय आता जनतेनेच दिला आहे. आमच्यासाठी राममंदिर हा राजकारणाचा नसून अस्मितेचा विषय आहे. लोकसभेत ३५० जागा मिळवून देणाऱ्या रामाला आम्ही त्याच्या जन्मस्थानी त्याला एक हक्काचे छप्पर देऊ शकत नाही ? असा सवाल करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून मोदींना सूचक इशारा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीमधील यशानंतर शिवसेनेच्या १८ खासदारांसह अयोध्येत जाऊन रामजन्मभूमीचं दर्शन घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा व कायदा बनवून भव्य राम मंदिराची उभारणी करावी, अशी मागणी केली आहे आणि त्यानंतर आता ‘राममंदिराचा जनादेश, वनवास संपवा!’ या सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा रामनामाचा नारा देण्यात आला आहे.

लेखातील ठळक मुद्दे –

श्रीरामाच्या कृपेनेच लोकसभेत  भव्य यश-

श्रीरामाच्या कृपेनेच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला भव्य यश लोकसभा निवडणुकीत मिळाले. हे यश फक्त अभूतपूर्वच नाही, तर विरोधकांना भुईसपाट करणारे आहे.रामाच्या नावाने आजचे दिल्लीतील सरकारही तरले. प. बंगालात जाऊन अमित शहा यांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिला आणि प्रभू श्रीरामाने कमाल केली. ममता बॅनर्जी यांना दुर्बुद्धी झाली. श्रीरामाचे नारे देणाऱ्यांना त्यांच्या सरकारने अपराधी ठरवले. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. ममता बॅनर्जींनी श्रीरामास विरोध केला म्हणून प. बंगालच्या हिंदुत्ववादी जनतेने भाजपचे १८ खासदार निवडून दिले.

जो रामाचा नाही तो कामाचा नाही- जनतेचा कौल 

उत्तर प्रदेशात अखिलेश-मायावती हे ‘बाबरी भक्त’ एक झाले. राममंदिरास या दोघांचा विरोध. त्यामुळे ‘जय श्रीराम’चा नारा देणाऱ्या ६१ खासदारांना विजयी करून भाजपला पूर्ण बहुमत मिळवून दिले.जो रामाचा नाही तो कामाचा नाही असा निर्णय आता जनतेनेच दिला आहे. राममंदिराचा विषय कोर्टात अडकला आहे. आमच्यासाठी राममंदिर हा राजकारणाचा नसून अस्मितेचा विषय आहे. कोर्टाचा निकाल लागायचा तो लागेल, पण संपूर्ण देश राममंदिराच्या बाजूने आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीतून निकाल दिला आहे. राममंदिराबाबत सर्वोच्च न्यायालय काय तो निर्णय देईल ते नंतर पाहू.

 केशव प्रसाद मौर्य यांच्या भूमिकेशी सहमत-

भाजपचे उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे आमच्या आधी एक दिवस अयोध्येत होते. रामजन्मभूमी न्यासाचे प्रमुख संत नृत्य गोपालदास महाराजांच्या जन्मउत्सवात अयोध्येतील सर्व साधुसंतांच्या उपस्थितीत केशव प्रसाद यांनी सांगितले, ‘‘रामजन्मभूमीवर मंदिर बांधण्याचे दोनच पर्याय आहेत. मुस्लिम पक्षकारांशी चर्चा अथवा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. हे दोन्ही पर्याय विफल झाले तर अध्यादेश काढून कायदा बनवून राममंदिराचे निर्माण व्हावे!’’ यावर जमलेल्या सर्व साधुसंतांनी विजयाचा शंखनाद केला. केशव प्रसाद हे साधे गृहस्थ नाहीत. त्यांचे बोलणे म्हणूनच महत्त्वाचे ठरते. आमच्या व त्यांच्या भूमिकेत तफावत नाही.

सरकारने पुढाकार घ्यावा –

३५० खासदारांचे बहुमत हाच राममंदिराचा जनादेश आहे. मंदिराच्या दिशेने सरकारनेच आता एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. अयोध्येतील श्रीरामाचा वनवास संपवायला हवा. श्रीरामाने आम्हाला ३५० खासदार दिले. सत्ता दिली. आम्ही त्याच्या जन्मस्थानी त्याला एक हक्काचे छप्पर देऊ शकत नाही? निवडणुकीनंतर सर्व विजयी खासदारांसह रामलल्लांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येऊ’ हा आमचा शब्द होता व ठरल्याप्रमाणे आम्ही आलो. खरे तर अयोध्यावासीयांचे म्हणा नाही तर रामलल्लांचे, पण आमचे ठरले आहे. आम्ही अयोध्येत येत राहू असे आमचे ठरले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

#YogaDay2019 : उंची वाढविण्यासाठी करा ‘ताडासन’ 

बेलाच्या पानात लपलय लोकसंख्या रोखण्याचं ‘गुपित’ ; ‘कॅन्सर’ आणि ‘लिव्हर’ साठी देखील फायदाच 

“संधिवात” बरा करायचा असेल तर पाळा हे पथ्य 

पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर ‘फळे’ खाण्यापूर्वी हे करा