मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंचं सर्वच खासदारांना पत्र, PM मोदींबद्दल म्हणाले…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सर्वपक्षीय खासदारांनी मतभेद विसरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी यासाठी सर्व खासदारांना राज्यसभेचे खासदार संभाजीराजे यांनी पत्र लिहले आहे.
खासदार संभाजीराजे यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण सर्वजण मराठा आरक्षण प्रश्नांविषयी जाणताच. महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषदेने एकमताने मराठा आरक्षण मंजूर केले. ते राज्यात लागू देखील झाले. त्यानंतर काही लोकांनी न्यायालयात धाव घेऊन आरक्षणाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणावर प्रश्न उपस्थित करुन ते पुढील निर्णया करिता पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले आहे.
न्यायालयाने शैक्षणिक आणि नोकर भरती स्थगिती दिली आहे. दुसऱ्या राज्यातील 50 टक्के पेक्षा जास्त असलेल्या आरक्षणाला अशा प्रकारे स्थगिती दिली गेली नसल्याचे दिसून येते. उदा. तामिळनाडू मधील आरक्षण प्रश्नांचा सुद्धा अजून निकाल लागला नाही. तरी तेथील राज्याने दिलेले आरक्षण चालू असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी पत्रात नमूद केले आहे.
महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांना @YuvrajSambhaji राजेंचे आवाहन…#MarathaReservation pic.twitter.com/QxpYVbyWow
— Chhatrapati Sambhajiraje FC (@ChhSambhajiraje) September 14, 2020
खासदार संभाजीराजे यांनी लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, केंद्राने आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाला 10 टक्के आरक्षण दिले आहे. ते देखील न्यायालयात आले आहे. परंतु केंद्र सरकारच्या शैक्षणिक आणि नोकर भरतीला स्थगिती देण्यात आलेली नाही. म्हणून मराठा आरक्षणाला न्यायालयाने जी स्थगिती दिली आहे, ती उठवण्यात आली पाहिजे अशी मागणी त्यांनी संभाजीराजे यांनी केली आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करुया. जवळपास 33 टक्केच्या वर असलेला हा समाज पूर्णत: दुखावला गेला आहे. मराठा समाजाची आजपर्यंत सर्वच पक्षाच्या नेत्यांनी केवळ दिशाभूल केली आहे. असा समज समाजात पसरत आहे. मला असे वाटते की, हा समज दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांनी मिळून एकजुटीने आरक्षण प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण जे ठरवाल त्यांच्या नेतृत्वात आपण पंतप्रधानांची भेट घेऊन हा मुद्दा मार्गी लावण्याचा प्रयत्न करु, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे सर्व खासदारांना केली आहे.