जावळी तालुक्यातील कुंभार, गणी मरडमुरे, हिरवे वस्ती, रेंडी मुरा, शेडगेवाडी, ढेबेवाडी, पदुमले, मूरे या गावांनी लोकसभा निवडणुकीत मतदान नकरण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व गावातील एकूण पाच हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवायचा नाही असा निर्णय घेतला आहे. भारत स्वतंत्र झाल्या पासून या गावात सरकारी विकास पोचलाच नाही त्यामुळे येथील लोकांच्या मनात लोकशाही प्रक्रिये बद्दल उदासीनता पसरली आहे. म्हणून या गावांनी बहिष्काराचा निर्णय घेतला आहे. तहसीलदारांना निवेदन देऊन या गावातील लोकांनी सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेद हि व्यक्त केला आहे.
या वेळी लोकांनी त्यांच्या गावात असणाऱ्या समस्यांचा पाढाच माध्यमांसमोर वाचून काढला आहे. या गावातील मुलांना २२ किलोमीटर पायपीट करून शिक्षणासाठी जावे लागते. येथे प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था आहे मात्र येथे शिक्षकांची कायम स्वरुपीची नेमणूक करण्यात येत नाही. गावात पिण्याच्या पाण्याच्या योजना नाहीत त्यामुळे या गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी येथील लोकांना मैलोमैल पायपीट करावी लागते. या सर्व समस्या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.