ऐतिहासिक ‘समझौता एक्सप्रेस’ पुन्हा रूळावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत पाकिस्तान यांच्यातील तणावानंतर समझौता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. येत्या ४ मार्चपासून समझौता एक्सप्रेस कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती PTI या वृत्तसंस्थेने दिली होती.  यानंतर आता समझौता एक्सप्रेस उद्या म्हणजेच 3 मार्चपासून सुरु होणार आहे अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे.

दरम्यान भारत पाक यांच्यातील तणावानंतर समझौता एक्सप्रेस अटारी येथे रोखण्यात आली होती. यावेळी ट्रेनमध्ये एकूण २७ प्रवासी होते. दरम्यानच्या प्रवाशांना भारतात कसे पाठवायचे ? यावर मात्र निर्णय झालेला नव्हता.

समझौता एक्सप्रेस

समझौता एक्सप्रेस ही भारत व पाकिस्तान देशांदरम्यान आठवड्यातून दोन वेळा धावणारी एक प्रवासी रेल्वेगाडी आहे. ही गाडी भारतीय राजधानी दिल्लीला अमृतसरमार्गे पाकिस्तानधील लाहोर शहरासोबत जोडते. भारतीय रेल्वेची दिल्लीहून सुटणारी गाडी भारत-पाकिस्तान सीमेजवळ अटारी गावापर्यंतच धावते. येथे सर्व प्रवाशांना उतरून कस्टम व इमिग्रेशन पूर्ण करावे लागते. त्यानंतर त्यांना पाकिस्तान रेल्वेद्वारे चालवल्या जात असलेल्या एका वेगळ्या गाडीत चढावे लागते. ती वेगळी गाडी लाहोरपर्यंत धावते.

सिमला करारात ठरल्याप्रमाणे ह्या रेल्वे प्रवासाचा २२ जुलै १९७६ रोजी प्रारंभ करण्यात आला. भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावपूर्ण संबंधांचा फटका ह्या सेवेला बसत असून आजवर अनेकदा ही सेवा स्थगित करण्यात आली आहे.