1 मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होईल; CM ठाकरे यांची घोषणा

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – येत्या 1 मेपर्यंत समृद्धी महामार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास सुरू होईल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी केली आहे. समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होईल तेव्हा तो सर्वोत्तम महामार्ग असेल, निश्चितच महाराष्ट्राला याचा अभिमान वाटेल, असे म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी महामार्गाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे सध्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. आज पहिल्यांदाच मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग प्रकल्पाची पाहणी केली. या प्रकल्पाचे काम अप्रतिम चालू आहे. प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा ज्याचा महाराष्ट्राला अभिमान वाटेल, असा आपल्या देशातील सर्वोत्तम महामार्ग बनेल, असे काम आपण केलेले असणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आपण हे काम ज्या गतीने करतो आहे. लॉकडाउनच्या काळात असे वाटले होते की, कामात खंड पडेल किंबहुना काम थोडस हळुवारपणे होईल, पण त्या काळातसुद्धा प्रकल्पाचे काम मंदावलेले नाही. मला खात्री आहे. येत्या 1 मेपर्यंत आपण नागपूर ते शिर्डी प्रवास या रस्त्यावरून सुरू होईल.

मुंबईपर्यंतही कामाला लवकरच सुरुवात येत्या 1 मेपर्यंत नागपूर ते शिर्डी प्रवास समृद्धी मार्गावरून सुरू झाल्यानंतर पुढच्या 1 मेपर्यंत आपण मुंबईपर्यंत पोहोचलेले असू, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.