वाळू माफियांची नवी शक्कल, गाढवांवरुन वाळू तस्करी

परभणी : पोलीसनामा आॅनलाईन – वाळू चोरीच्या प्रकारामुळे राज्यातील अनेक नद्यांची चाळण झाली आहे. वाळू माफिया वाळू चोरण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या शोधून कढत असतात. वाळू माफियांच्या  बोटी, जेसीबी, ट्रॅक्टर आदी वाहनांवर कारवाईचे प्रमाण वाढल्यानंतर वाळू माफियांनी वाळू तस्करी करण्यासाठी नवीन फंडाच शोधून काढला आहे. आता वाळू माफियांनी नामी शक्कल लढवत वाळू तस्करीसाठी गाढवांचा वापर सुरु केला आहे. सदर गाढवाचा वापर करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई करताना मात्र  महसूल प्रशासन चक्रावून गेल्याचं दिसत आहे. कारण पकडलेल्या गाढवांचा सांभाळ मात्र प्रशासनाला करावा लागणार आहे.

वाळू चोरण्याच्या ना ना क्लृप्त्या वाळू माफियांनी आजपर्यंत वापरल्या आहेत. परंतु गाढवांचा वापर हा नवीनच फंडा आता त्यांनी सुरू केला आहे. आज वाळूच्या वाढत्या तस्करीने परभणी जिल्ह्यातील गोदावरी, दुधना आणि पूर्णा या तीन महत्वाच्या नद्यांची अत्यंत बिकट झाल्याचं दिसत आहे. वाळू ठेक्यांच्या लिलावावर उच्च न्यायालयाने कडक निर्बंध घातले आहेत त्यामुळे वाळू ठेक्यांचे लिलाव अद्याप झाले नाहीत. परंतु याचाच फायदा वाळू माफियांकडून घेतला जात आहे. वाळू माफियांकडून नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जाताना दिसत आहे. गोदावरी, दुधना आणि पूर्णा या तीन महत्वाच्या नद्यांनीच परभणी जिल्ह्याला समृद्ध बनवलं आहे.

58 गाढवं पकडून कोंडवाड्यात कोंडली
वाळूची तस्करी करताना वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या टीप्पर, ट्रॅक्टर, जेसीबी या वाहनांवर  महसूलचे पथक कडक कारवाई करतात. हीच गोष्ट लक्षात घेत वाळू माफियांनी आगळी वेगळी वाळू तस्करीसाठी गाढवांचा वापर वाढवला आहे. गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसायची आणि गाढवांच्या साहाय्याने नदीपासून दूर अंतरावर वाहून नेत त्याचे ढिगारे केले जायचे. तिथून वाहनांच्या साहाय्याने वाळू वाहतूक करून जास्त भावाने ती विक्री केली जायची. अशा प्रकारे वाळु माफिये वाळूची चोरी करत असत. दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात होणारी ही चोरी लक्षात आल्यानंतर तहसिलदारांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने या गाढवांवर कारवाई केल्याचे दिसत आहे. या कारवाई नंतर गंगाखेडमधील गाढव मालक मात्र फरार आहेत. दरम्यान या कारवाई अंतर्गत गंगाखेडमध्ये 26 तर सोनपेठ मध्ये 32 गाढवं पकडून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे  वाळू माफियांनी लढवलेल्या या नामी शकलीमुळे प्रशासनाचे अधिकारी मात्र चक्रावून गेल्याचे दिसत आहेत.

उपसा कायमचा बंद करावा : गावकऱ्यांची मागणी 
परभणी जिल्ह्यातील वाळूच्या ठेक्यांचा अद्याप लिलाव झालेला नाही. दरम्यान उच्च न्यायालयाने हे वाळू ठेके देताना कडक निर्बंध घालून दिले आहेत. परभणी जिल्ह्यात एकूण 65 पेक्षा जास्त वाळूचे ठेके आहेत. लिलाव न झाल्याने  सध्या केवळ शासकीय कामांसाठीच काही ठिकाणाहून वाळू उपसण्याचे आदेश आहेत. परंतु वाळू माफिये मात्र अवैधपणे वाळू उपसा करत आहेत. मुख्य म्हणजे प्रशासन कारवाई करत असतानादेखील ना ना प्रकारच्या शक्कली लढवत वाळू उपसा सुरूच आहे. दरम्यान नदीकाठच्या गावातील पाणी पातळीवर याचा परिणाम झाला असल्याने सदर वाळू उपसा कायमचा बंद करण्याची मागणी गावकरी करत आहेत.

गाढवांना खाऊ-पिऊ घालायचे काम प्रशासनाचे
प्रशासनाने कारवाई करून कोंडवाड्यात कोंडलेली गाढवं किती दिवस कोंडून ठेवणार? हा एक मोठा प्रश्न आहे. कारण प्रशासन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या पोलीस ठाणे, तहसीलमध्ये लावून ठेवते खरे पंरतु त्या मालकांवर गुन्हे दाखल करुन दंड वसूल करुन गाड्या सोडल्या जातात. मुख्य म्हणजे या पकडलेल्या गाढवांना  खाऊ-पिऊ घालायचे काम देखील प्रशासनाला करावे लागणार आहे.