काँग्रेसकडून जी काही नावे निश्चित केली असल्याचे समजते, त्यात प्रामुख्याने सोलापुर मधून सुशीलकुमार शिंदे, दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा , रामटेकमधून मुकुल वासनिक, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे आणि नांदेडमधून अमिता चव्हाण यांचा समावेश आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघात संजय निरुपम , हिंगोलीतून राजीव सातव यांची नावे आघाडीवर असल्याचेही सूत्रांनी सांगितले. तर नागपूर मधून नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोले यांना उमेदवारी देण्याबाबत कॉंग्रेस विचार करत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडी झालेली असली तरी अहमदनगरसह इतर काही जागांवरून त्यांच्यात वादंग निर्माण झाला आहे . हा तिढा अद्याप कायम आहे. काँग्रेसच्या पुण्याच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. तर काँग्रेसने राष्ट्रवादीच्या अहमदनगरच्या जागेवर दावा केलेला आहे . दोन्ही पक्ष या जागा सोडण्यास तयार नाहीत. तिढ्यात असलेल्या जागा वगळता इतर जागावरील उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला दोन्ही पक्षांनी वेग दिल्याचे दिसून येते.