दिलासादायक ! राज्यातील ‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना काही जिल्हे कोरोनामुक्त होत आहे. ही राज्यासाठी समाधानाची बाब म्हणावी लागेल. सांगलीतील कोरोना रुग्णांची संख्या शून्य झाल्याने सांगली जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.

इस्लामपूरमधील त्या 26 व्या महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर शहरातील कोरोना बाधित मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 15 जणांचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नांदेड नंतर सांगली जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना सांगलीत एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र अचानक कोरोना बाधितांची सख्या वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत होती. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वेळीच हालचाली करत प्रशासनाला सूचना दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतल्याने सांगली जिल्हा मुक्त झाला आहे.

सांगली येथील कोरोना बाधित झालेल्या व काल रविवारी मृत्यू झालेल्या रुग्णाच्या संपर्कात 16 जण आले होते. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये मृत रुग्णाच्या कुटुंबातील 5 जणांचा समावेश आहे. त्यापैकी आई, वडील, भाऊ व पत्नी, मुलगा यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना बाधित आणि मयत व्यक्तीशी संबंधीत संपर्क बाधित अन्य 11 जण इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये होते. त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. अद्याप 15 जणांचे रिपोर्ट येणे बाकी असून त्यांचे रिपोर्ट जर निगेटिव्ह आले तर सांगली शहरावर आणि जिल्ह्यावरचा मोठा धोका टळला असे म्हणता येईल.