‘बाळासाहेब ठाकरेंनी पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला, महाराष्ट्र जात-धर्म मानत नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मनोहर जोशी यांच्या रुपानं महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला. महाराष्ट्र हा जात-पात-धर्म मानत नाही असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. ब्राह्मण असल्यानं आपल्याला मराठा आरक्षणाच्या लढाईदरम्यान टार्गेट केल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता.

फडणवीसांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्र जात-पात-धर्म मानत नाही. महाराष्ट्रानं मुस्लिम मुख्यमंत्री पाहिला आहे. अल्पसंख्यांक मंत्री राज्यात होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच मनोहर जोशी यांच्या रुपानं महाराष्ट्राला पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री दिला.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “अकाली दल एनडीएतच आहे , ते बाहेर पडले असं आपण म्हणू शकत नाही. त्यांनी फक्त शेतकरी विधेयकावरून मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. संवाद थांबल्याचा हा परिणाम आहे. संवाद राहिला असता तर शिवसेनेलाही मजबुरीनं बाहेर पडावं लागलं नसतं. पण तो इतिहास झाला.” असंही त्यांनी यावेळी बोलतान सांगितलं.

संजय राऊत असंही म्हणाले की, “शिवसेना आणि अकाली दल हे एनडीएचे मजबूत खांब होते. मात्र आता दुसरा खांबही डळमळीत झाला आहे. त्यामुलं एनडीए अस्तित्वात आहे मानायला तयार नाही.”