‘…म्हणून राज्यपालांकडे जाणं हा महाराष्ट्राचा अपमान’, संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वाढीव वीजबिल प्रश्नासंदर्भात राज्यपालांना भेटण्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा अपमान आहे. सरकार लोकनियुक्त आहे. लोकांनी निवडून दिलेलं आहे. कोणत्याही प्रश्नासाठी पहिल्यांदा संबंधित खात्याच्या मंत्र्यांना त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकार अधिकार नाही असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरे यंना टोला लगावला आहे. पुण्यात आोयजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘वीजबिलासाठी कोणी राष्ट्रपतींकडे गेलं नव्हतं’
संजय राऊत म्हणाले, “राज्यपालांनी राजभवनात निवांत राहावं. त्यांची नेमणूक केंद्राकडून होते. परंतु राज्याच्या तिजोरीतून राज्यपालांवर खर्च केला जातो. राज्यपालांना राजकारण करायचं असेल तर राजभवनाच्या बाहेर या, मैदानात येऊन राजकारण करा. घटनात्मक पदाचा सन्मान राखतो ही आमची भूमिका आहे. वीजबिलासाठी कोणी राष्ट्रपतींकडे गेलं नव्हतं. 2 जी घोटाळ्यात मंत्र्यांची नावं समोर आली होती. म्हणून राष्ट्रपतींकडे गेलो होतो.” असं ते म्हणाले.

‘राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये’
पुढे बोलताना राऊत म्हणाले, “शरद पवार (Sharad Pawar) आमचे नेते आहेत. राज्यपाल शरद पवारांना नेता मानतात त्याचे स्वागत करतो. परंतु राज्यपालांनी त्यांना भेटायला येणाऱ्यांना पंतप्रधान, राष्ट्रपतींकडे पाठवायला हवं. राज्यपालांना शरद पवारांचं मार्गदर्शन हवं असेल तर मी पवारसाहेबांना विनंती करेन की, तुम्ही राज्यपालांना मार्गदर्शन करा. राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनू नये” अशी टीकाही संजय राऊतांनी राज्यपालांवर केली आहे.