शिवसेना खासदार संजय राऊत यांचा केंद्रावर हल्लाबोल, म्हणाले – ‘कंगना रनौत देशप्रेमी आणि शेतकरी देशद्रोही ?’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   “आजच्या काळात सत्य बोलणाऱ्याला गद्दार आणि देशद्रोही म्हटलं जातंय, त्याच्यावर खटला दाखल केला जातो. आमचे सदस्य संजय सिंग, शशी थरूर आणि पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ” शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत सादर केलेल्या आभारप्रदर्शनावरील चर्चेत भाग शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाग घेतला होता. ते यावेळी म्हणाले, “मला वाटते की आयपीसीमधील कलम रद्द करुन देशद्रोह हे एकच कलम ठेवलं आहे. “देशांतर्गत हिंसाचाराच्या प्रकरणातही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जात आहे.आपल्या देशात आपल्यासाठी देशभक्त कोण आहे?” अर्णब गोस्वामी, कंगना रनौत? देशाच्या सुरक्षेसंदर्भातील महत्वाची कागदपत्रे लीक करणारा देशभक्त आहे. मोदीजींना मोठं बहुमत मिळालं आहे आणि मी त्याचा आदर करतो.” बहुमत हे देश चालवण्यासाठी आहे. पण, बहुमत अहंकाराने चालत नाही.”

पुढे बोलताना राऊत म्हणाले, “शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत ते देशाच्या प्रतिष्ठेसाठी चांगले नाही. २६ जानेवारीला लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान झाला. प्रत्येकजण दु:खी झाले. किसान आंदोलनाच्या दिवसापासून १०० हून अधिक तरुण बेपत्ता आहेत. कुठे आहे ते? चकमकीत पोलिसांनी मारले की अजून काय केले हे माहिती नाही. लाल किल्ल्याचा अपमान करणारा दीप सिद्धू कोण आहे? तो कोणाचा माणूस आहे? याबद्दल का नाही सांगत? त्याला शक्ती कोणी दिली? आतापर्यंत तो पकडला गेला नाही. मात्र, २०० हून अधिक शेतकरी या प्रकरणात बंदिस्त असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

“गाझीपूर, सिंघू सीमेवर तीन महिन्यांपासून हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. आपल्याला (सरकार) हे देशद्रोही वाटतात? हे पंजाब हरियाणातील शेतकरी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी लढा देत आहेत. जेव्हा आमच्या शीख बांधवांनी मोगलांशी युद्ध केले, तेव्हा आम्ही त्यांना योद्धा म्हणून संबोधले. इंग्रजांशी दोन हात केल्यानंतर ते देशभक्त होते. कोरोनाच्या काळात लंगरमधून लाखो नागरिकांची भूक यांनी भागवली त्यावेळी ते देशभक्त होते. आज तो आपल्या हक्कांसाठी लढत आहे, तर तो खलिस्तानी बनला? दिल्ली सीमेवर तुम्ही खिळे ठोकले. हेच काम सीमेवर केले असते तर चिनी भारतात घुसले नसते.”, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.