शिवसेनेच्या छाताडावर ‘बेताल’ ! ‘तरुण भारत’च्या अग्रलेखातून संजय राऊतांवर टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विक्रम वेताळच्या कथेप्रमाणे महाराष्ट्र सध्या उद्धव आणि ‘बेताल’ यांची कथा ऐकतोय, पाहतोय. अशा शब्दात तरुण भारत या दैनिकाने शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी ओल्या दुष्काळाने होरपळतोय आणि दिवसेंदिवस महाराष्ट्र देखील होरपळतोय मात्र यासाठी महाराष्ट्र शिवसेनेला कधीच माफ करणार नाही. अशा शब्दात तरुण भारत या दैनिकाने शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे.

उद्धव ठाकरे यांचे भाजप आणि मुख्यमंत्र्यांशी असलेले संबंध सर्वांनाच माहित आहे. तसेच उद्धव यांनी अनेकदा राज्यातील शेतकरी महत्वाचा आहे अशी विधाने केली आहेत मग अशा परिस्थितीत हा बेताल शिवसेनेच्या छाताडावर बसल्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेदना होत आहेत अशा शब्दात तरुण भारतमधून संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

तरुण भारतच्या आग्रलेखातील महत्वाचे मुद्दे
या एका ‘बेताला’च्या मागे संपूर्ण शिवसेना फरफटत जात असेल तर त्याहून दुसरे दुर्दैव कोणते म्हणता येईल ?

हे ‘बेताल’ रोखठोकपणे ठोकून देतात की, भाजपाला 105 जागा मिळाल्या, कारण शिवसेना सोबत होती. अन्यथा भाजपाला 70 जागा तेवढ्या मिळाल्या असत्या. उद्या भाजपाने असे म्हटले की, सेनेला 56 जागा मिळाल्या, कारण भाजपा सोबत होती, अन्यथा 20 सुद्धा मिळाल्या नसत्या, तर काय?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपली हयात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजवटीतून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी घालविली. हा ‘बेताल’ मात्र त्याच बाळासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष धुळीस मिळविण्याच्या मागे लागला आहे.

भाजपा आज सरकार स्थापन करू शकत नाही, असे अजीबात नाही. सर्वांत मोठा पक्ष म्हणून तो कुठल्याही क्षणी दावा करू शकतो आणि शपथविधी सुद्धा लगेच होऊ शकतो. बहुमत वगैरे पुढच्या हिवाळी अधिवेशनात सिद्ध करता येईल. पण, भाजपाने तसे अजून केलेले नाही. याला एक विशिष्ट अर्थ आहे. भाजपाला जनादेशाची पूर्ण जाण आहे.

संजयने दृष्टी देण्याचं काम केलं पाहिजे, पण, संजयच धृतराष्ट्र होणार असेल, तर शिवसेनेच्या भवितव्यासाठी महाराष्ट्रानं चिंतीत होणं स्वाभाविक आहे. ‘बेताल’ जर खांद्यावरून उतरला नाही, तर सिंहासन बत्तीशीच्या कथाच तेवढ्या शिल्लक राहतील. अर्थात, ज्या फांदीवर बसलो आहोत, ती कापणार्‍याला लाकुडतोड्या नाही तर ‘शेखचिल्ली’ म्हणतात, याचं भान शिवसेनेला असेलच.

शेतकर्‍यांबाबत सर्वाधिक पुळका आणण्याचा आव शिवसेनेचाच, राममंदिरासाठी सुद्धा लढा दिल्याचा दावा शिवसेनेचाच. या अनेक प्रश्र्नांमध्ये आणखी एक प्रश्र्न महाराष्ट्राच्या मनात घोंगावतोय, तो मराठी बाण्याचा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या पुढाकाराबद्दल प्रश्र्नचिन्ह उपस्थित करून माध्यमांमध्ये फडणविसांच्या एकाकीपणाबाबत कितीही बातम्या पेरल्या, तरी त्यातून महाराष्ट्राचे निखळ मनोरंजन होण्यापलीकडे काहीही होणार नाही. अर्थात ‘विदूषक’ म्हणून आपल्याकडून हेच अपेक्षित आहे.

कुठल्याही भाजपाच्या नेत्याने या बेताल विदुषकाला उत्तर देण्याची तसदीही घेतली नाही. कारण, त्यातून मनोरंजन होण्यापलीकडे काहीही होणार नाही. महाराष्ट्राचे हित तर कधीही साधले जाणार नाही.

आता याच ‘विदुषका’ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते? अलिकडे रोज सकाळी ‘टिवटिव’ करताना केवळ हिंदीचा वापर हा मूळ मराठी बाण्याचा शिवसैनिक नसलेला नेता करतो. ‘अति तेथे माती’, ‘अति शहाणा त्याचा ‘…’ रिकामा’, ‘अंगापेक्षा बोंगा मोठा’ अशा अनेक मराठी म्हणी या महाराष्ट्राच्या तोंडावर आहेत. त्या यांना का आठवत नाही? की मराठी बाण्याचे निव्वळ सोंगच समजायचे?

4 निवडणुकांमध्ये विरोधी पक्षात बसण्याचा कौल युतीला मिळाला. त्यापैकी 3 वेळा विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे होते. पहिल्यांदा 2009 मध्ये भाजपाचा एक सदस्य अधिक असल्याने विरोधी पक्षनेते पद भाजपाकडे आले. ज्यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी सुद्धा संख्याबळ पाहिले, ते आज मुख्यमंत्रिपदाबाबत कसा दावा करू शकतात?

या आधी युतीमध्ये 1990 ला भाजपा 42, सेना 52, 1995 मध्ये भाजपा 65, सेना 72, 1999 मध्ये भाजपा 56, सेना 69, 2004 मध्ये भाजपा 54, सेना 62, 2009 मध्ये भाजपा 46, सेना 45 असे संख्याबळ होते. या 5 पैकी एका निवडणुकीत युतीची सत्ता आली. पण, सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेचे असल्याने मुख्यमंत्रिपद सेनेकडेच होते.

अपक्षांना सुद्धा कायद्यानं पक्षांतर करता येत नाही, तर मग निवडणूकपूर्व युतीतील पक्ष निवडणुकीनंतर वेगळे कसे होऊ शकतात ? आणि मुख्यमंत्रिपदासाठीचा जो आटापिटा चाललाय, तो कधीतरी शिवसेनेनं भाजपाच्या जागा कमी असताना देऊ केला काय ?

महाराष्ट्रात राजकीय पक्षांना जो काही जनादेश मिळाला, त्याचा अर्थ स्पष्ट आहे. हा जनादेश भाजपा आणि शिवसेना यांना एकत्र बसून राज्यकारभार करता यावा, यासाठीचा आहे. खरं तर भाजपाला बाजूला ठेवून कोणताही पक्ष सरकार स्थापन करूच शकत नाही, हे स्पष्टच आहे.

रोज एक अग्रलेख लिहिणं, सकाळी 9 वाजता वाहिन्यांना मुलाखती देणं आणि दिवसभर मग विशेष मुलाखती देत फिरणं किंवा बातम्या पेरणं यात आणि महाराष्ट्रासारख्या राज्याचा राज्यकारभार चालवून दाखविणं यातील अंतर समजून घेण्याची ज्यांच्यात क्षमता नाही, त्यांच्याकडून ती अपेक्षा तरी कशी करायची ?

Visit : Policenama.com