संजय राऊत यांचा पुन्हा भाजपवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘सुशांत प्रकरणी अजेंडा सेट केला जातोय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. त्यांनी म्हंटलंय की, अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी भाजप अजेंडा सेट करत आहे. तसेच याव्दारे महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांना कमीपणा दाखवण्याचाही ते प्रयत्न करीत आहेत. एका प्रसारमाध्यमाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.

’अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालंय. शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोखठोकपणे यावर भूमिका मांडल्याने नव्या वादाला तोंड फुटलं होतं. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिस यांचा कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी मुंबई पोलिस हे जगातील उत्तम पोलिस आहेत. बिहारमधल्या राजकारणासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे.’ असा स्पष्ट उल्लेख राऊत यांनी केलाय.

’विनाकारण दिल्ली आणि बिहारचे लोक संशयाचे धुकं निर्माण करत आहेत. पण, सर्वांनाच माहित आहे की, नेमकं सत्य काय आहे ते?. जे काही सुरू आहे त्यात अजिबात तथ्य नाही. हिटलरकडे एक गोबेल्स आहेत आणि आपल्या राज्यात दहा राज्यात गोबेल्स आहेत,’ असेही संजय राऊत यांनी म्हंटलंय.

सांगा बरं, सीबीआयने हातात घेतलेली खुनाची कोणती प्रकरणं सुटली? याचं उत्तर कुणी देणार का? बिहारमध्ये गेल्या वर्षभरात सात ते आठ हत्या झाल्या. ही प्रकरणं सीबीआयकडे गेली होती? यातले आरोपी पकडले आहेत का? या सगळ्याचं उत्तर नाही असेच आहे. राजकारण करायचं म्हणून सीबीआयकडे प्रकरण द्यायचं का?. मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाच्या पुढे सीबीआय एक पाऊल जरी पुढे गेलं तरी मी सीबीआयचा पुतळा उभा करीन, अभिनेता सुशांत सिंह रजपूत प्रकरणात मुंबई पोलीस तपास करीत आहेत. त्यात सीबीआयचा काय संबंध? असा प्रश्न देखील संजय राऊत यांनी केलाय.

’अभिनेता सुशांत सिंह रजपूतच्या कुटुंबियाविषयी एका प्रसारमाध्यमाच्या कार्यक्रमात मत मांडताना संजय राऊत यांनी भाष्य केलंय. ’सर्वांनी संयम पाळायला हवा होता. त्यांनी सरळ महाराष्ट्र सरकार, पोलिसांवर आणि तरुण मंत्र्यांवर आरोप करत आहेत. तेव्हा त्यांनी संयम बाळगला का?, मी 35 वर्षांनंतर बोलतोय. सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली का? हा काही वादाचा मुद्दा आहे का? या प्रश्नाचं उत्तर तपास झाल्यानंतर पुढे येईल, त्या वेळेस मी बोलेन,’ असंही संजय राऊत यांनी म्हंटलंय.