Satara : पालकमंत्र्यांकडून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी ! कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार 1420 हेक्टर वरील पिकांचे नुकसान

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – चालू ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे कृषी विभागाच्या प्राथमिक नजरअंदाजानुसार जिल्ह्यातील 1 हजार 420 हेक्टरचे नुकसान झाले आहे तरी संबंधित विभागांनी तात्काळ पंचनामे करुन तसा अहवाल सादर करावा, अशा सूचना आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सातारा तालुक्यातील अंबवडे बु. या गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भात पिकाची पहाणी केली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या पहाणी प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, तहसीलदार आशा होळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत आदी उपस्थित होते.

सातारा तालुक्यातील भात, सोयाबीन व भुईमुग 60 हेक्टर, कोरेगाव तालुक्यातील सोयाबीन, भाजीपाला व आले 120 हेक्टर, खटाव तालुक्यातील बटाटा, कांदा 70 हेक्टर, कराड भात, ज्वारी 20 हेक्टर, पाटण तालुक्यातील भात 200 हेक्टर, खंडाळा तालुक्यातील भाजीपाला 5 हेक्टर, वाई तालुक्यातील भात, सोयाबीन व भाजीपाला 15 हेक्टर, महाबळेश्वर तालुक्यातील भात 30 हेक्टर, फलटण तालुक्यातील भाजीपाला, मका व ज्वारी 390 हेक्टर, माण तालुक्यातील ज्वारी व मका 510 हेक्टर असे एकूण 1 हजार 240 क्षेत्रावरील वरील पिकांचे नुसान कृषी विभागाच्या प्राथमिक नजरअंदाजानुसार नुकसान झाले आहे.

जिल्ह्यातील महत्वाच्या धरणांमधून सध्या विसर्ग सुरु आहे. पाऊसाचे प्रमाण वाढल्यास हा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. तसेच भारतीय हवामान खात्याने पुढील काही दिवसात बहुतेक ठिकाणी वीजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी अतिवृष्टीच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.