स्वाभिमानीचे रात्रभर भजन, कीर्तन करत जागर आंदोलन

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला साहित्यिकांसह खेळाडू, तसेच विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाला महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांनीसुद्धा पाठिंबा दर्शवला असून, सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे. कार्यकर्त्यांनी रात्रभर भजन, कीर्तन करत जागर आंदोलन केले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, जनार्दन आवारे, हणमंत जाधव, संदीप पाटील, मनोज जाधव, सुनील जाधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राजू शेळके म्हणाले, केंद्र सरकारने मंजूर केलेली तीन कृषी विधेयके शेतकरीविरोधी असल्याने पंजाब, हरियाणा व इतर काही राज्यांतील शेतकरी केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरला आहे. या आंदोलक शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्रातील शेतकरी असल्याने केंद्र सरकारच्या विरोधात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने राज्यभर जागर आंदोलन करण्यात आले.