आश्चर्यजनक ! SBIकडे बिनधनी २ हजार ८५२ कोटी रूपये ; जाणून घ्या बिनधनी खात्यांची संख्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील आघाडीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडे तब्बल २८५२.६६ कोटी रुपये कोणत्याही दाव्याशिवाय पडून आहेत. या रकमेवर अधिकार सांगायला कुणीही पुढे आलेले नाही.
माहितीच्या अधिकारात स्टेट बँकेने ही माहिती दिली आहे. त्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देशभरातील हजारो शाखांमध्ये नागरिकांनी आपली खाती उघडल्यानंतर त्यात काहीना काही रक्कम ठेवली जाते. मात्र, काही कारणाने पुढे या खात्यात काहीही व्यवहार होत नाही.
अनेकदा खातेदाराचा मृत्यु झाल्यानंतर त्याचे वारसदार खात्यात किरकोळ रक्कम असल्यास त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा त्यांना अशा खात्याची माहितीच नसते. यामुळे स्टेट बँकेच्या विविध खात्यात ही खाती विना वारस तशीच राहतात. ३१ मार्च २०१९ अखेर बँकेच्या देशभरातील १ कोटी ८ लाख ८६ हजार ४८५ खात्यांमधील २ हजार ८५२ कोटी ६६ लाख रुपये विना दावा पडून आहे.
एसबीआयने ३१ मार्च २०१९ पर्यंत प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत एकूण १० कोटी ९७ लाख ७८ हजार ७७५ खाती उघडली. त्यात २३ हजार १६३.३७ कोटी होते. १ कोटी २५ लाख २८ हजार ४५ शून्य जमा खाती उघडली. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीसाठी बँकेने गेल्या वर्षात ६.२४ कोटी खर्च केले.
मात्र, सर्वात मोठे पहिले १० डिफॉल्टर्स, थकित कर्ज आदी कारवाईसह अन्य माहिती बँकेने गोपनियतेच्या कारणावरून पुरविण्यास नकार दिला आहे.