१ मे पासून बदलणार SBI चे नियम ; ९५ % ग्राहकांवर होणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील काही दिवसांपासून स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आपल्या अनेक सेवांमध्ये बदल करत आहे. काही दिवसांपूर्वीच एसबीआयने जुने एटीएम बंद करून नवीन एटीएम सुरु करून एटीएममधून पैसे काढण्याचे नियम बदलले. त्यानंतर एसबीआयने व्याजदरांबाबत नवे नियम लागू करणार आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिकच्या ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरांवरच हा नियम लागू होणार आहे. १ मे पासून लागू होणाऱ्या या नियमाचा परिणाम ४० कोटींहून अधिक ग्राहकांवर आहे.

एसबीआयच्या व्याजदरांबाबत नवे नियम खालीलप्रमाणे –
एसबीआयने आपल्याकडील ठेवी आणि कर्जाचे व्याजदर आरबीआयच्या बेंचमार्क दरांसोबत जोडले आहेत. त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेच्या रेपोरेटमध्ये बदल झाल्यानंतर एसबीआयमधील ठेवी आणि कर्जाच्या व्याजदरांवरही परिणाम होणार आहे.

रिझर्व्ह बँकेने हल्लीच व्याजदरांमध्ये ०. २५ टक्क्यांनी कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर एसबीआयसह अन्य बँकांनी गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील व्याजामध्ये कपात केली होती. एसबीआयने कर्जावरील व्याजदरामध्ये ०. ०५ टक्क्यांनी किरकोळ कपात केली आहे. ३० लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जावरील व्याजदरातही एसबीआयने ०. १० टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे आता ३० लाखांपर्यंतच्या होम लोनवरील नवीन व्याजदर ८. ६० ते ८. ९० टक्के असेल. हा दर आतापर्यंत ८. ७ ते ९ टक्के होता.

ज्या ग्राहकांच्या ठेवी एक लाख रुपयांपर्यंतच आहेत, अशा ग्राहकांना नवे नियम लागू झाल्यानंतरही पूर्वीप्रमाणेच ३. ५ टक्के व्याज मिळणार आहे. मात्र बचत खात्यामध्ये एक लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम असल्यास ३. २५ टक्के व्याज मिळणार आहे.

हे नियम लागू झाल्यापासून ग्राहकांना बचत खात्यांवर पूर्वीपेक्षा कमी व्याज मिळणार आहे. त्याचा परिणाम एसबीआयच्या सुमारे ९५ टक्के ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे.