दुर्दैवी ! शालेय विद्यार्थ्याचा नदीत बुडून मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  पोहण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय शालेय विद्यार्थ्याचा कुंभी नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परखंदळे (ता.पन्हाळा) येथे शनिवारी (दि. 22) सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे परखंदळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रसाद गणपती देसाई (वय 16) असे बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद हा इयत्ता 10 वीत शिकत होता. तो गेल्या काही दिवसापासून कुंभी नदीवरील गोठे पुलाजवळ पोहण्यासाठी जात होता. त्याला अद्यापही नीट पोहता येत नव्हते. शनिवारी सकाळी मित्रांसोबत तो नेहमीप्रमाणे पोहायला गेला. पाण्यात उतरल्यानंतर त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. यावेळी पोहायला आलेली इतर मुले त्याच्यापासून दूर असल्याने त्यांना त्याला वाचवता आले नाही. सुमारे 2 तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी सव्वानऊच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्रसादच्या मागे आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे.