शाळांना सुट्टी 1 मे नंतरच, परीक्षा संपल्यावर तातडीने सुट्टी नाही

मुंबई: वृत्तसंस्था
ज्या विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी सुट्टीचं प्लॅनिंग केले असेल, त्यांना आता थोडी तडजोड करावी लागणार आहे. राज्यातील पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता 1 मे नंतरच उन्हाळी सुट्टी मिळणार आहे. राज्य सरकारने तसा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना आता एप्रिलमध्ये जरी वार्षिक परीक्षा संपली तरी शाळेत जावेच लागणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरणाने तसा शासन निर्णय काढला आहे.
काही शाळांतील परीक्षा मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात होतात. तर काहींच्या 20 एप्रिलपर्यंत संपतात. त्यानंतर विद्यार्थी शाळेत न येता थेट निकालाच्या दिवशीच शाळेत जातात. त्यानंतर शाळेला उन्हाळी सुट्टी सुरु होते. मात्र आता एप्रिलमध्ये जरी परीक्षा संपली तरी, 30 एप्रिलपर्यंत शाळेत जावेच लागेल.
परीक्षा संपल्यानंतर काय करायचे असा विचार या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचा मनात आला असेल. मात्र याकाळात शाळांमध्ये उन्हाळी शिबीरे, विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. सरकारने तसे आदेश शाळांना दिले आहेत.