राज्यातील शाळा आता 21 सप्टेंबरपासून नव्हे तर दिवाळीनंतर सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्यातील शाळा आता 21 सप्टेंबरपासून नव्हे तर दिवाळीनंतर सुरु होणार आहेत. याबाबतची माहिती शिक्षणमंत्र्यांनी नुकतीच दिली आहे.

केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु करता येतील का? याबाबत शिक्षण विभागाने शुक्रवारी संस्थाचालक महामंडळाची बैठक घेण्यात आली. यात संस्थाचालकांनी शाळा सुरु करण्यास नकार दिलाय. म्हणून आता दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

केंद्र सरकारने राज्यात 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीच्या शाळा नियमित सुरु करण्याबाबत नुकतेच निर्देश दिले होते. त्याबाबतची एसओपीही (स्टण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) जाहीर केली. परंतु महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या बघता 21 सप्टेंबरपासून शाळा सुरु करणे योग्य नाही, अशी भूमिका शुक्रवारच्या ऑनलाईन बैठकीत संस्थाचालकांनी मांडलीय. दिवाळीनंतर याबाबत निर्णय घ्यावा, अशी देखील मागणी केलीय.

बैठकीला शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा, शिक्षण संचालक दिनकर पाटील, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, युनिसेफच्या रेशमा अग्रवाल यांच्यासह शिक्षण विभागातील विविध अधिकारी, शिक्षणाधिकारी आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागामध्येही कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे 21 सप्टेंबरपासून मुलांना शाळेत पाठविण्यास पालकही संमती देणार नाहीत. निवासी शाळा तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरु करु नये. मागील वर्षी आलेले वेतनेत्तर अनुदान परत गेलंय. हे अनुदान आता सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता साहित्य खरेदीसाठी तातडीने द्यावे, अशी मागणी बैठकीमध्ये केलीय. संस्थाचालक महामंडळाच्या मागणीची शिक्षण मंत्र्यांनी दखल घेऊन 21 सप्टेंबरपासून कोणतीही शाळा सुरु होणार नाही, असे आता स्पष्ट केलं आहे.

शाळेच्या शुल्काबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय झाला आहे. आता शासनाने तसे लेखी निर्देश देणे गरजेचे आहे. विनाअनुदानित शाळांची फी भरण्याबाबत शासनाने निर्देश द्यावे, अशी मागणी या बैठकीमध्ये संस्था चालकांनी केलीय.

केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्यासाठी एक मानक ऑपरेटिंग प्रक्रिया अर्थात एसओपी जारी केली होती. याअंतर्गत केवळ इयत्ता 9 वी ते 12 वीपर्यंतचे विद्यार्थीच्या शाळा सुरु होणार होत्या. तसेच शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून सर्व नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एका वेळी शाळांमध्ये 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना बोलवावे, ज्या शाळांत बायोमेट्रिक हजेरी लावण्याची पद्धत आहे, तेथे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी इतरही काही व्यवस्था असणे गरजेचे आहे. जर शाळा विद्यार्थ्यांसाठी वाहन व्यवस्था करीत असेल तर दररोज नियमितपणे वाहनाची स्वच्छता करावी, असे नियम दिलेत. त्याचसोबत शाळांना कोरोनाचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने खबरदारीही घ्यावी लागेल.

शाळेत थर्मल स्कॅनर आणि नाडी ऑक्सिमीटरची उपलब्धता असणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांसह संपूर्ण कर्मचार्‍यांचे थर्मल स्कॅनिंग शाळेमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी करावे. याशिवाय त्यांचे हात देखील स्वच्छ करावेत. शिक्षक आणि इतर कर्मचार्‍यांना शाळेकडून मास्क आणि हँड सॅनिटायझर्स देण्यात येतील. शाळा दररोज उघडण्यापूर्वी संपूर्ण परिसर, सर्व वर्ग, प्रॅक्टिकल लॅब आणि बाथरूम सोडियम हायपोक्लोराइट सोल्युशनद्वारे स्वच्छ करावेत, असेही केंद्र सरकारने सांगितले होते.