मुंबईत आज मध्यरात्रीपासून कलम 144 लागू !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबई शहरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत. मुंबईत आज मध्य रात्रीपासून 8 दिवसांसाठी 144 कलम लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे 30 सप्टेंबर पर्यंत संचारबंदीच्या काळात 4 पेक्षा अधिक लोकांना एकत्र बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. ही संचारबंदी असून नवीन लॉकडाऊन नाही, असं पोलीस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना या दरम्यान प्रवासाची मुभा असणार आहे. मात्र, त्यांना देखील फिजिकल डिस्टन्स ठेवणे, कमीत कमी सहा फुटांचे अंतर ठेवणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. केवळ अत्यावश्यक काम असेल तरचं घराबाहेर पडावे. घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. राज्य सरकार टप्प्या टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील करत आहे. एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळित करण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा नियम कडक करण्यात आले आहेत.

कोरोनाच्या प्रसारामुळे मुंबई शहराला धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थिती किंवा हालचालींवर बंदी घालण्यासाठी किंवा धार्मिक स्थळांवर कुठेही कुठल्याही प्रकारची जमवाजमव करण्यास मनाई आदेश जारी करणे योग्य ठरेल, असे आदेशात सांगण्यात आले आहे.