सुरक्षारक्षकाचं अपहरण अन् नंतर खून, रांजणगाव पोलिसांनी 24 तासात आरोपींच्या आवळल्या मुसक्या

शिक्रापुर : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक परिसरातील वेअर हाऊस मधून वेअर हाऊसच्या सिक्युरिटी गार्डचे अपहरण करून खून करण्यात आलाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत रांजणगाव पोलिसांनी तत्परता दाखवत चोवीस तासाच्या आत तीन आरोपींना अटक केली आहे .

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार रांजणगाव औद्योगिक परिसरातील एका वेअरहाऊस मधून वेअरहाऊसचा सेक्युरिटी गार्ड रामआसरे लालमन मिश्रा (वय वर्षे ५५ मुळगाव उत्तर प्रदेश) यांचे अज्ञात व्यक्तींकडून अपहरण झाल्याबाबत रांजणगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आला होता. त्यानुसार घटनेचे गांभीर्य ओळखत रांजणगाव पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे जोरदार फिरवत. गुप्त माहितीच्या आधारे सुत्रधार लक्ष्मण शिंदे (वय वर्ष २० शिरसगाव काटा) , विकास बाळासाहेब जगताप (वय वर्षे २१,न्हावरा) कमलेश भीमराव पवार (वय वर्ष 21 निर्वी)या तीन व्यक्तींना शिताफीने ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सिक्युरिटी गार्ड चे अपहरण केल्याचे कबूल दिली तर सिक्युरिटी गार्डच्या बँक अकाउंट वर मोठी रक्कम असल्याच्या माहितीवरुन आरोपीने त्याचे अपहरण करून त्याच्या एटीएम मधून पैसे काढून घेण्याचा प्लॅन आखला होता. परंतु मिश्रा यांने एटीएम मधून पैसे काढून देण्यास विरोध केल्याने आरोपीनी त्याला जीवे ठार मारून टाकले व पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह पारगाव ता. दौंड येथील पुलावरून भीमा नदीत पाञात टाकून दिला होता रांजणगाव पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून मृतदेह टाकलेल्या अंतरापासून शोध घेतला असता पुढील सात किलोमीटर अंतरावर वडगाव रासाई ता.शिरूर गावच्या हद्दीत भीमा नदी पात्रात मृतदेह आढळून आला.

याबाबत रांजणगाव पोलिसांत विकास बाळासाहेब जगताप , कमलेश विक्रम पवार आणि सुत्रधर लक्ष्मण शिंदे अशा तीन आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदर कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास रांजणगाव पोलिस करत आहेत