प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- प्रजासत्ताक दिन अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. देशात याची जोरदार तयारी सुरू असल्याचंही दिसत आहे. संवेदनशील ठिकाणांमध्ये सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी तयारी सुरु असल्याचं दिसत आहे. मुख्य म्हणजे देशाची राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिल्लीला सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी दिल्लीला 28 सेक्टरमध्ये विभागले असून त्याची जबाबदारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे असेही समजत आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभप्रसंगी दिल्लीत काही घातपात घडू नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. मुख्य म्हणजे  दिल्ली पोलिसांसोबत सुरक्षा जवान दिवस-रात्र काम करत असल्याचंही समजत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, विजय चौकापासून ते लाल किल्ल्यापर्यंत 600 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार, या सुरक्षा व्यवस्थेसाठी 50 हजार पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. नवी दिल्लीमध्ये सर्व प्रमुख बाजार, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन, एअरपोर्ट, बस स्थानके, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे अशी माहिती दिल्ली पोलीस प्रवक्ता मधुर वर्मा यांनी दिली आहे.

पोलिसांसोबतच लष्कराने सुरक्षेबाबत विशेष काळजी घेतली आहे. काही महत्वपूर्ण स्थळांची जबाबदारी लष्कराने घेतली असल्याचं समजत आहे.  ठिकठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केली जात आहे. शिवाय जी ठिकाणं संवेदनशील आहेत त्या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली आहे असेही समजत आहे.