पोलिसनामा ऑनलाईन : Seema Haider | जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने कडक पावले उचलली आहेत. केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत देश सोडून जाण्यास सांगितले आहे. दरम्यान आता सीमा हैदर चर्चेत आली असून तिला पाकिस्तानात परत जावं लागणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
भारतीय नागरिक असलेल्या सचिन मीनाच्या प्रेमासाठी सीमा हैदर पाकिस्तानातून भारतात आली होती. सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली. सर्वप्रथम ती पाकिस्तानातील शारजाहून टुरिस्ट व्हिसावर नेपाळला पोहोचली. नेपाळमध्ये काही दिवस घालवल्यानंतर ती काठमांडू ते दिल्लीच्या बसमध्ये बसली आणि आपल्या चार मुलांसह भारतात पोहोचली होती. जिथे सीमा हैदरने सचिन मीनाशी लग्न केले होते. तेव्हापासून सीमा हैदर भारतात राहात आहे. उत्तर प्रदेश एटीएसने सीमा आणि सचिनचीही पूर्ण चौकशी केली आहे.
सीमा हैदर कोणत्याही व्हिसा किंवा पासपोर्टशिवाय भारतात पोहोचली होती. तिची केस अजूनही कोर्टात प्रलंबित आहे. सीमा हैदरने भारतीय नागरिक असलेल्या सचिन मीना याच्याशी विवाह केला आहे. अशा परिस्थितीत जर उत्तरप्रदेश सरकारने सीमा हैदर विरोधात याप्रकरणी अहवाल दाखल केला तर तिला कोणत्याही व्हिसा किंवा पासपोर्टशिवाय भारतात आल्याबद्दल शिक्षा होऊ शकते किंवा तिला परत पाठवले जाऊ शकते, अशी चर्चा आहे.