भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा घणाघात, म्हणाले – ‘मुख्यमंत्री बंगले अन् त्यांचे मंत्री बायको लपवतात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तानूसार, मुख्यमंत्री बंगले लपवतात तर त्यांचे मंत्री बायको लपवतात, असा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याचप्रमाणे 3 महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळातून बाहेर रहावे, याबाबतचा व्हिडीओही किरीट सोमय्या यांनी ट्विट केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनीही धनंजय मुडेंवर निशाणा साधला आहे.

सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी लोकमतला सांगितले. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्विट करत तिने ही माहिती दिली आहे. याबाबत मुंबई पोलीस अधिक तपास करत आहे. १० तारखेला याबाबतची तक्रार दिली. ११ तारखेला मुंबई पोलिसांकडून अर्ज स्विकारण्यात आला आहे.

त्यानंतर धनंजय मुंडे यांनी माझ्यावरचे आरोप खोटे आणि मला ब्लॅकमेल करणारे आहे असे त्यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट ही केली आहे. धनंजय मुंडे यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता पुन्हा एकदा रेणू शर्माने ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ब्लॅकमेलशिवाय ते आणखी कशाचा आधार घेऊ शकत नाही. तसेच मी मरेपर्यंत लढत राहणार, असं रेणू शर्मा यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्याला धोका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.