खळबळजनक ! पिठाच्या गोळ्यातून विष दिल्यानं 30 डूक्करांचा अन् 3 श्वानांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वारजे माळवाडी परिसरात पिठाच्या गोळ्यातून वीष देऊन 30 डुक्करांना मारण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यावसायिक वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अनिल कुर्‍हाडे (रा. बाबूजीनगर) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी परिसरात गोकुळनगर पठार परिसर आहे. त्याठिकाणी डुक्करे चरण्यासाठी सोडले जातात. दरम्यान, फिर्यादी हे वडार समाजाचे असून, त्यांचा डुक्करांचा व्यावसाय आहे. त्यांची डुक्करेही या परिसरात सोडले जातात.

दरम्यान, गुरुवारी गोकुळनगर परिसरातील 30 डुक्कर आणि 3 श्वानांचा विष बाधेमुळे मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला. यानंतर फिर्यादींनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांना पिठाच्या गोळ्यातून विष देण्यात आल्याचे समोर आले आहे. तर, हा प्रकार व्यावसायातून झाल्याचेही तपासात समोर आले आहे. पोलिसांकडून आरोपीचा माग सुरू करण्यात आला असून, त्याला पकडण्यासाठी पोलीस कसून शोध घेत आहेत.

दरम्यान, यापुर्वी शहरात पाळीव तसेच फिरस्त्या श्वानांना देखील विष पाजून मारण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. प्राणी प्रेमींकडून याची गंभीर दखल घेतली जाते. आता श्वानां ऐवजी व्यावसायिक वादातून डुक्करांना मारण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.