राज्य सरकार प्रत्येकवेळी एक ‘अभासी’ आकडा फेकतं, फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने राज्याला कशी मदत केली, याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यावर महाविकास आघाडीने बुधवारी तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी केलेले आरोप खोडून काढले. यावर परत फडणवीस यांनी फेसबुक लाईव्ह करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलेली आकडेवारी खोटी असल्याचा आरोप केला.

फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीला उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. देवंद्र फडणवीस यांनी आभासी पत्रकार परिषद घेतली त्याला आम्ही उत्तर देतोय. फडणवीस यांनी आपल्या समोर गोष्टी ठेवून असं चित्र उभं केलं की केंद्र सरकार भरघोस मदत देऊनसुद्धा महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत आहे. लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून सत्य परिस्थिती समोर मांडतोय, असं शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं. तर फडणवीस यांना मुख्यमंत्री उपलब्ध नसतील तर उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटावं, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक लाईव्ह करत राज्य सरकारला केंद्र कशी मदत करत आहे, याची पुन्हा आकडेवारी दिली. राज्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. हे सरकार ही परिस्थिती हाताळायला अपयशी ठरलं आहे. केंद्राने मदत करूनही सरकार मान्य करत नसल्याचा गंभीर आरोप त्यांन केला आहे. राज्य सरकार दरवेळी काहीतरी अभासी आकडेवारी फेकत असल्याचं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक लाईव्हमधील प्रमुख मुद्दे
– कापूस खरेदीसाठी सर्व पैसे केंद्र सरकार देते. त्याप्रमाणे ते पैसे केंद्राने दिले आहेत.
– रेल्वेच्या तिकीटांसाठी राज्य सरकार 7 ते 9 लाख रुपये देते. मात्र, केंद्राला ती रेल्वे चालवण्यासाठी 50 लाख रुपये लागतात.
– टॅक्सचे पैसे खातेदारांच्या खात्यात थेट जमा झाले आहेत.
– मुंबई कोरोना चाचणी कमी करण्यात आल्या आहेत. संपूर्ण देशात 5 टक्के लोक पॉझिटिव्ह निघतात. त्यापैकी महाराष्ट्रात हे प्रमाण 12 ते 13 टक्के आहे. तर मुंबईत मे महिन्यात हे प्रमाण 32 टक्के इतके आहे.
– 26 मे पर्यंत महाराष्ट्राला 9 लाख 88 पीपई किट देण्यात आले आहेत. 16 लाख एन 95 मास्क दिले आहे. ही सामुग्री विकत घेण्यासाठी 468 कोटी रुपये केंद्राने राज्याला दिले आहेत.
– प्रत्येक वेळेस एक अभासी आकडा फेकायचा आणि केंद्राकडून पैसे येणे बाकी आहे, इतकंचं सांगण्याचं काम राज्य सरकारकडून सुरु आहे.
– दिव्यांगांना केंद्राने दिलेले 122 कोटी रुपये रेग्युलरपेक्षा जास्त पैसे दिले आहेत.
– केंद्राने नोव्हेंबर आणि डिसेंबर पर्य़ंत राज्याचे जीएसटीचे पैसे दिले आहेत. त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल, असा प्रकार राज्य सरकारकडून चालल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.