सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला खिंडार, शेतमजूर संघटना बरखास्त

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना आणखीन एक धक्का बसला आहे. रयत क्रांती शेतमजूर संघटना बरखास्त करण्यात आली आहे. याबाबतची माहिती संघटनेने पश्चिम महाराष्ट अध्यक्ष सुरेश सासणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदे दरम्यान दिली. त्याबरोबरच शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील संघटनेच्या अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला खिंडार पडले आहे.

या पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना ससाणे यांनी सदाभाऊ खोत यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली ते म्हणाले, “सदाभाऊ खोत हे चळवळीतील कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. संघर्षातून निर्माण झालेल्या या नेतृत्त्वाकडून वर्षानुवर्षे अन्याय झालेल्या शेतमजूरांना किमान न्याय मिळेल याचा विचार करुन त्यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही संघटनेची मोठ्या प्रमाणात बांधणी केली. राज्यात २ कोटी शेतमजूर असून एकट्या शिरोळ तालुक्यात ८४ हजार शेतमजूर आहे. मंत्री खोत यांच्याकडे शेतमजूरांच्या मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी केराची टोपली दाखवली”.

वापरा आणि सोडा पद्धतीमुळे संताप
यावेळी पुढे बोलताना ससाणे म्हणाले, सदाभाऊ खोत यांची कामकाज पद्धती ही वापरा आणि सोडा अशा स्वरूपाची आहे. शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे अशी आमची मागणी होती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याबाबत तोडगा निघेल अशी आशा होती मात्र बैठकीनंतरही मंत्री खोत यांनी महामंडळासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत.

एवढेच नाही तर वारणानगर येथे झालेल्या शेतकरी, शेतमजूर परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतमजूर स्वतंत्र कल्याणकारी मंडळ घोषित करणार असल्याचे खोत यांनी सांगितले होते, पण त्याबाबत चकार शब्द उच्चारला गेला नसल्याने आम्ही व्यासपीठ सोडले होते. खोत यांची कामकाज पध्दत पाहता भविष्यातही शेतमजूरांना न्याय मिळणार नाही अशी खात्री झाल्याने ही संघटना बरखास्त केल्याचे सासणे यांनी सांगितले.