परप्रांतीयांना राज्यात आणण्यासाठी धोरण आखावे, शरद पवारांचा ‘सल्ला’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या दोन महिन्यापासून देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने मजूर, कामगार हे आपआपल्या गावी परत गेले आहे. मात्र, यामुळे राज्यात विविध कंपन्यांना काम करणे आवघड जात आहे. याबाबत शरद पवार यांनी लॉकडाऊननंतर आर्थिक संकट सोडवण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

शरद पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्य सरकार लॉकडाऊनची परिस्थिती शिथिल करीत आहे. पण मजूर, कामगार खेड्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे कारखाने पुन्हा सुरु करण्याच्या स्थितीत नाहीत. आपणाला त्यांना परत आणण्यासाठी धोरण राबवणे आवश्यक असल्याचा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, राज्यामध्ये नवीन गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी औद्योगिक विकासाला प्रोत्साहित करण्यासाठी नवीन धोरणांचा समावेश केला पाहिजे. आयात, निर्यात आणि आंतर्देशीय शिपिंग वाढवण्यासाठी उद्योगपती, उद्योजक आणि क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांशी सल्ला मसलत करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.