मोदी सरकारच्या घोषणांचं शरद पवारांकडून ‘स्वागत’, मात्र व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे लोकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या काही निर्णयाचं स्वागत केलं. मात्र, त्याचवेळी त्यांनी काही अपेक्षाही व्यक्त केल्या आहेत.

शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हमध्ये म्हटले आहे की, आज संकट गंभीर.. दीर्घकालीन परिणाम करणारं आहे. प्रत्येकाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारं हे संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून मी घराबाहेर पडलो नाही. मी कुणालाही भेटलोही नाही. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विविध संस्थावर मोठी जबाबदारी असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. याचवेळी त्यांनी केंद्र सरकारकडून शेतकरी, असंघटीत कामगार, वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांच्याबाबत काही मागण्या केल्या आहेत.

काय आहेत मागण्या ?
1. जे काही निर्णय झाले त्यात शेतीच्या दृष्टीने आणखी निर्णय घेण्याची गरज आहे. जे काही पॅकेज दिलं ते पुरेसे नाही. पीक कर्ज भरणं आता अवघड होणार आहे.
2. सरकारने प्रभावी पावलं टाकली पाहिजेत.
3. शेतकऱ्यांना थकबाकीदार बनवून त्यांना मिळणारं नवीन कर्ज थांबवता कामा नये.
4. कापसाची खरेदी थांबली आहे. कापूस उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. त्याला मदत करण्याची गरज आहे.
5. धान्य मोफत देण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. पण त्याचा शेतकऱ्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करण्याची गरज आहे.
6. असंघटित कामगारांचाही विचार करावा लागणार आहे.
फेसबुक लाईव्हमधील ठळक मुद्दे ?
1. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या घोषणांचं स्वागत करुयात
2. कोरोनाचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होणार, त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल.
3. वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांना सरकारने प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला पाहिजे.
4.विविध घटकांना केंद्र सरकारने मदत करण्याची गरज, यासाठी आम्ही सरकारसोबत आहोत.
5. आपले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. त्यासाठी सतर्क राहुयात. सरकारला सहकार्य करुयात.
6. सरकार आणि विविध संस्थांच्या सूचनांना प्रतिसाद देण्याची गरज आहे.
7. प्रत्येक सूचना नाही पाळली तर जबरदस्त किंमत मोजावी लागेल.