भाजपने लोकमताचा अनादर केला, सांगलीतून प्रत्युत्तर देण्यास सुरूवात – शरद पवार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली महापालिकेत बहुमत असतानाही भाजप उमेदवारांचा पराभव करीत काँग्रेसच्या मदतीने सत्तांतर घडवून आणल्यानंतर महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामती येथे भेट घेतली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, भाजपने लोकमताचा अनादर करीत काही राज्यांतील सत्ता हस्तगत केली, त्याला प्रत्युत्तर देण्याची सुरुवात सांगलीतून झाली. ही चांगली घटना आहे. आता सर्वांना विश्वासात घेऊन विकास कामे करा असा सल्ला शरद पवार यांनी यावेळी दिला.

यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे उपस्थित होत्या. सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सत्तांतरावेळी घडलेल्या घडामोडीची माहिती शरद पवार यांना दिली.

शरद पवार यांनी सत्तांतराच्या वेळी घडलेल्या घडामोडीची माहिती घेऊन महापौर निवडीवेळी किती सदस्यांनी आघाडीला मतदान केले, किती गैरहजर होते याची माहिती घेतली. आघाडीला मदत करणाऱ्यांनाही विकासकामे करीत असताना विश्वासात घ्या, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. भाजपने ज्या पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांवर हल्ले करीत सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न केले, त्यांना चोख प्रत्युत्तर सांगलीतून मिळाले असून ही सुरुवात असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.