‘दुसरा मोदी तयार होऊ नये म्हणून ‘ही’ काळजी घेतोय’

दौंड : पोलीसानामा ऑनलाईन – बारामती लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात तीन ठिकाणी सभा घेत कार्यकर्त्यांना प्रचारासाठी मार्गदर्शन दिले. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मी माझं बोट आता कोणाला धरु देत नाही. दुसरा कोणी मोदी तयार होऊ नये म्हणून मी ही काळजी घेतोय, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच त्यांनी यावेळी भाजप सरकारवरही निशाणा साधला.

माझं बोट धरुन राजकारणात येणाऱ्या मोदींनी वर्ध्याच्या सभेत माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर टीका केली. पवार कुटुंबात भांडणे आहेत, असं म्हटलं गेले. वैयक्तिक टीका करु नये हा राजकारणाचा नियम आहे. मला दिल्लीत मोदी भेटल्यावर त्यांना मी विचारेल, असं पवार यांनी म्हटलं आहे.

आमच्या आघाडीत मिलावट आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदी टीका करतात. आम्ही काही पक्ष एकत्र आलो ही गोष्ट खरी आहे. देशभरात आम्ही सगळे मिळून २६ पक्ष आहोत. पण भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष हे एकूण ३६ पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे मोदी जर आम्हाला मिलावट म्हणत असतील तर ते महामिलावट आहेत’, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.

मागील निवडणुकीत विकासाचा मुद्दा काढून भाजप सत्तेत आले, मात्र आता ते विकासाचा मुद्दा बाजूला सारून हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत आहेत. मंत्रीपदाची शपथ घेताना आपण सर्व जातीच्या धर्माच्या लोकांच्या हिताची जपणूक करु, अशी राष्ट्रपतींसमोर शपथ घेतो. पण आता भाजपचे मंत्री हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणत आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यामुळे त्यांच्या शब्दाला आणि शपथेला किंमत नाही. आपल्या मनातील गोष्ट करायची आणि त्यास लोकांचा पाठिंबा नसेल त्यावेळी लोकांना भलत्याच दिशेने न्यायचं, असे त्यांचे काम सुरु असून या गोष्टी चांगल्या नाही. या पद्धतीने देश चालत नाही, असं सुचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.