पालघर ‘मॉब लिंचिंग’ प्रकरणावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले …

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पालघर मध्ये घडलेल्या ‘मॉब लिंचिंग ‘ प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. केवळ राजकीय नव्हे तर संपूर्ण देशभर याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधताना या विषयावर भाष्य केले आहे. ते म्हणाले ,” घडलेलं प्रकरण निषेधार्ह आहे. ते घडायला नको होतं. पण यामध्ये कोणीही राजकारण करू नये असे शरद पवार म्हणाले.

याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, ” ‘एका घटनेच्या आधारे महाराष्ट्राचा नावलौकिक खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पालघरला झालं त्याचा आणि कोरोनाचा काही संबंध नाही. पालघर प्रकरणाचा संबंध शोधण्यासाठी जी काही नेमणूक करायची आहे ती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्य सरकारने खबरदारी घेतली आहे. असा एखादा प्रकार गैरसमजुतीनं घडला की लगेच राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. घडलेलं प्रकरण निषेधार्ह आहे. ते घडायला नको होतं. पण यामध्ये कोणीही राजकारण करू नये,’ अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे.

“पालघरमध्ये जे घडले ते घडायला नको होते , ते दुर्दैवी आणि निंदनीय आहे. यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि त्याच रात्री घटनेत सामील झालेल्या 100 हून अधिक लोकांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे”. असे देखील शरद पवार म्हणाले. मात्र या घटनेचे राजकारण केले जाऊ नये असे मत त्यांनी मांडले.

पवारांकडून जनतेला नियम पाळण्याचे आवाहन

‘राज्यातील कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. काळजी घ्या…घराबाहेर पडणं टाळा. गाईडलाईन्स पालन करणं गरजेचं आहे. सर्वांना विनंती आहे की संकटांच्या संबंधी निगेटिव्ह विचार करणं सोडून द्या…आपण सामना करणार आहोत आणि जिंकणार आहोत…त्यामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे,’ असं म्हणत शरद पवार यांनी राज्यातील जनतेला दिलासा दिला. यावेळी शरद पवार यांनी पालघर हत्याकांडावरही भाष्य केलं.

काय आहे पालघरमधील हत्या प्रकरण?

पालघरमधील गडचिंचले गावात जमावाकडून दोन साधू आणि त्यांच्या चालकाची हत्या करण्यात आली. पालघरमधील दाभाडी-खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला ग्रामस्थांनी रोखलं होतं. या प्रवाशांची विचारपूस पूर्ण ऐकून घेण्याच्या आतच ग्रामस्थांनी दगडफेक करायला सुरुवात केली.याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे या घटनेमुळे देशभर खळबळ उडाली आहे.